साहित्यिक बाबा भांड : तळेगाव ढमढेरेत सोनाई व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात आवाहन
तळेगाव ढमढेरे – जगातील सर्व धर्मांनी विषमता, अन्याय, भेदभाव यांना नकार देऊन समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय यांची कास धरायला हवी, तरच जगात ज्ञानविज्ञान, शांती, सहिष्णुता आणि विकासाचे वातावरण निर्माण होईल, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यिक बाबा भांड यांनी केले.
तळेगाव ढमढेरे येथे आयोजित सोनाई व्याख्यानमालेत “महाराजा सयाजीराव गायकवाड एक द्रष्टा राजा’ या विषयावर बोलत होते. ते पुढे म्हणाले, जपहिल्या जागतिक धर्म परिषदेतले स्वामी विवेकानंदांचे भाषण उचलून धरणाऱ्या भारतीयांनी महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या या जागतिक योगदानाची मात्र उपेक्षा केली. आज भारतात आणि जगात वाढत असलेल्या विघटनवादी शक्तींना पायबंद घालण्यासाठी आणि युवा पिढीला ध्येयवादी बनवण्यासाठी सयाजीरावांचे विचार आणि कार्य प्रेरणादायी, ऊर्जादयी आहे, असे विचार ख्यातनाम साहित्यिक, प्रकाशक आणि सयाजीरावांच्या साहित्याचे संशोधक बाबा भांड यांनी मांडले. अध्यक्षस्थानी माजी आमदार सूर्यकांत पलांडे होते.
भांड म्हणाले, शिकागो येथे झालेल्या दुसऱ्या जागतिक धर्म परिषदेचे अध्यक्षस्थान सयाजीराव गायकवाड महाराज यांनी भुषवले होते, जगभरातील सर्व धर्मप्रमुखांच्या आणि हजारो अभ्यासकांच्या समोर सयाजीरावांनी समाजात मानवता धर्माशिवाय जगाला पर्याय नाही असे ठाम प्रतिपादन केले होते. महाराजांनी 1892 साली बडोदा राज्यात शिक्षण मोफत आणि सक्तीचे केले. बडोदा संस्थानात 3690 ग्रंथालये सुरू केली. वाचन चळवळीत जगात अमेरिका आणि ब्रिटननंतर तिसरा क्रमांक बडोद्याचा होता. त्यांनी विविध सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक संस्थांना त्याकाळात 1 कोटी 89 लाख रुपयांच्या देणग्या दिल्या होत्या. बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी परदेशी शिक्षणासाठी सहाय्य केले आणि मिलिटरी खात्याचे सचिव यांना बडोद्याच्या विधीमंडळात आमदार केले.
सयाजीरावांच्या साहित्य, भाषणे अणि आदेशांचे 500 खंड प्रकाशित केले जाणार आहेत. दुर्दैवाने या त्यांच्या मौलिक कार्याकडे गेल्या 70 वर्षांत महाराष्ट्राचे लक्ष गेलेले नाही, अशी खंत व्यक्त केली. यावेळी माजी सभापती आरती भुजबळ, कवी भरत दौंडकर, सोमनाथ भुजबळ, अनिल नरके, विध्या बॅंकेचे संचालक महेश ढमढेरे, रामदास भुजबळ, विष्णु नरके आणि सुनिता भुजबळ यांची भाषणे झाली. यावेळी कासारी ग्रामपंचायतीचे सदस्य गोपाळ भुजबळ, रेश्मा गायकवाड, चेतना ढमढेरे, सुरेश भुजबळ, सोमनाथ कुदळे आदि मान्यवर आणि श्रोते उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा. हरी नरके यांनी केले तर माजी उपसरपंच राकेश भुजबळ यांनी आभार मानले.