दुबई – पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या एका अनोख्या कामगिरीला मागे टाकले आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यांत 14 वे अर्धशतक फटकावताना त्याने कोहलीच्या कामगिरीला मागे टाकले आहे.
यंदाच्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत भरात असलेल्या पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करताना विजेतेपदाचीही दावेदारी भक्कम केली आहे. मंगळवारी नामिबियाविरुद्ध खेळताना बाबर आझमने कर्णधारपदाला साजेशी कामगिरी करत 39 चेंडूत 50 धावा केल्या.
तसेच त्याने त्यानंतरही अफलातून फटकेबाजी करत 70 धावांची खेळी केली. कोहलीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत 13 वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.
आझमने 27 सामन्यांत हा विक्रम प्रस्थापित केला आहे, तर कोहलीने 44 सामन्यांत ही कामगिरी केली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन्सने 50 सामन्यांत 11 अर्धशतके फटकावली आहेत.