नवी दिल्ली : अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये हाय अलर्टचे आदेशदेखील देण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून रेल्वे प्रशासनाला हाय अलर्टचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी रेल्वेस्थानक आणि रेल्वे गाड्यांवर अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आरपीएफ आणि जीआरपी जवान व अधिकाऱ्यांच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने याविषयीचा आदेश जारी केला आहे. आदेश मिळताच मुरादाबाद रेल्वे विभाग स्टेशनची सुरक्षा वाढविण्यात आली आहे. संशयितांवर नजर ठेवली जात आहे. पोलिस अधीक्षक पी.के. तिवारी यांनी, गाझियाबाद, सहारनपूर आणि मुरादाबाद ही सीओ मंडळे आहेत. तर चौदा पोलिस ठाणे आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व सीओ आणि स्टेशन प्रभारी सतर्क झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
रेल्वे स्थानक आणि गाड्यांमधील अफवा पसरवणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. रेल्वे स्थानकावरील सर्वच विक्रेता, टीटीई, कर्मचाऱ्यांशी बैठक घेण्यात आली तसेच या बैठकीत जर कोणतीही अफवा पसरली असेल तर ताबडतोब जीआरपी आणि संबंधित अधिकाऱ्यांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, रोडवेज कॉर्पोरेशनने अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. आधीच सुट्टीवर गेलेले अधिकारी आणि कर्मचारी त्यांनाही परत बोलावण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना त्यांची तैनात साइट न सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परिवहन महामंडळ मुरादाबाद विभागाचे विभागीय व्यवस्थापक एस.के. शर्मा म्हणाले की, अयोध्या प्रकरणाच्या निर्णयामुळे सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्यांचे पदाचे स्थान न सोडण्याचे आदेश देण्यात आले.