चार दिवसांचा जिल्हा ग्रंथ महोत्सव; परिसंवाद, कवी संमेलन, साहित्यिक कार्यक्रमांची रेलचेल
सातारा – सातारा जिल्हा ग्रंथमहोत्सव समितीच्यावतीने 21 वा जिल्हा ग्रंथ महोत्सव जिल्हा परिषद मैदानावरील कर्मवीर भाऊराव पाटील नगरीत नवीन वर्षात दि. 3 ते 6 जानेवारी या कालावधीत होणार आयोजित करण्यात आला आहे. महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी व साहित्यिक इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती समितीचे कार्यवाह प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे व शिरीष चिटणीस यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
दरम्यान, या ग्रंथमहोत्सवासाठी मंडप उभारणीच्या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत व माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते आणि समितीचे कोषाध्यक्ष प्रदीप
कांबळे, साहेबराव होळ, कार्यकारिणी सदस्य डॉ. राजेंद्र माने, सुनीता कदम, नंदा जाधव, संतोष लाड, अनिल डांगे, फिरोज पठाण, सचिन शिंदे, शंकर साळुंखे, नंदकुमार साळुंखे यांच्या उपस्थितीत झाले.
डॉ. पाटणे म्हणाले, दि. 3 जानेवारी रोजी सकाळी साडेआठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडीचे पूजन होईल. त्यानंतर दिंडी कर्मवीरनगरीकडे मार्गस्थ होईल. या दिंडीत सात चित्ररथ सहभागी होणार असून त्यासाठी शाळांना विविध विषय देण्यात आले आहेत. त्यानंतर सकाळी 11 वाजता ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या हस्ते होणार आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. राज्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील, संजय भागवत, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, जिल्ह्यातील खासदार, आमदार, जिल्हा परिषद, नगरपरिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समित्यांचे सभापती उपस्थित राहणार आहेत.
उद्घाटनानंतर दुपारी 3 वाजता “मला समजलेले कर्मवीरअण्णा’ या विषयावर प्रा. जगन्नाथ देसाई यांचे व्याख्यान होणार आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील अध्यक्षस्थानी असतील. दुपारी साडेचार वाजता डॉ. मंदार दातार, उमेश झिरपे, डॉ संदीप श्रोत्री व एव्हरेस्टवीर आशिष माने यांचा सहभाग असलेला “खाद्य वनस्पतींचा इतिहास’, सायंकाळी सव्वापाच वाजता पर्यटन साहस व सुरक्षितता हा कार्यक्रम होणार आहे.
सायंकाळी सात वाजता प्रा. राजेंद्र मिस्त्री (कोल्हापूर) यांचा “नाद सूरमयी’ कार्यक्रम होणार आहे. शनिवार, दि. 4 रोजी सकाळी साडेआठ वाजता “चला घडू या’ या कार्यक्रमात ज्येष्ठ बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड व सैनिक स्कूलचे अधीक्षक रणजित नलावडे, नगराध्यक्ष माधवी कदम, पत्रकार अध्यक्ष हरिष पाटणे उपस्थित राहणार आहेत.
बालसाहित्यिका रेणू गावसकर व माधुरी सहस्रबुद्धे यांचा “हासती नाचती बोलती मुले’ हा कार्यक्रम सकाळी साडेदहा वाजता आणि दुपारी तीन वाजता “स्मृती जयांची चैतन्य फुले’ हा परिसंवाद होणार आहे. डॉ. शरद गायकवाड, ह. भ. प. प्रमोद महाराज, डॉ. भारती पाटील, उमेश घोंगडे, अविनाश थोरात, प्राचार्य डॉ यशवंत पाटणे यांचा सहभाग असेल. सायंकाळी 7 वा अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्याशी प्रकाश पारखी व सुनीता कदम गप्पा मारणार आहेत. रविवार, दि. 5 रोजी सकाळी साडेआठ वाजता शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी तीन वाजता नवोदितांचे व चार वाजता निमंत्रिताचे कवी संमेलन ज्येष्ठ कवी उद्धव कानडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
प्रदीप कांबळे, विष्णू थोरे, साहिल कबीर, धनंजय तडवळकर, संतोष काळे, नवनाथ कोलवाडकर या कवींचा सहभाग असेल. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे व साहित्यरत्न सरोजिनी बाबर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त प्रकाश खांडगे यांच्या संकल्पनेवर आधारीत योगेश चिकटगावकर, विकास कोकाटे यांचा “रानजाई लोककलेची’ हा कार्यक्रम सायंकाळी होणार आहे.
सोमवार, दि. 6 रोजी दुपारी 3 वाजता ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य सुनीलकुमार लवटे यांच्या उपस्थितीत ग्रंथमहोत्सवाचा समारोप होणार असून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल अध्यक्षस्थानी असतील. त्या आधी सकाळी साडेआठ वाजता “इथे घडतात वाचक, वक्ते’ या सदरात शालेय विद्यार्थ्यांची वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. त्यानंतर 11 वाजता विद्यार्थ्यांचे कथाकथन व सायंकाळी सहा वाजता बंडा जोशी, भालचंद्र कोळपकर, अनिल दीक्षित, अनिल गुंजाळ यांचा “हास्ययात्रा’ कार्यक्रम होणार आहे. या ग्रंथ महोत्सवात 80 स्टॉलची नोंदणी झाली असून सात चित्ररथ ग्रंथदिंडीत सहभागी झाल्याची माहिती शिरीष चिटणीस यांनी दिली.