तीन आठवड्यानंतरही अहवाल नाही
पिंपरी – पवना नदीत प्रदूषणामुळे मासे व कासवांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या घटनेनंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस नोटीस बजावली होती. तसेच, नदी प्रदूषणास महापालिकेचा विभाग कारणीभूत असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा खटला दाखल करण्याबाबत नोटीस बजावली. मात्र, तीन आठवडे उलटूनही त्याबाबत कोणताही अहवाल सादर केला नाही.
प्रदूषण नियंत्रण मंडळाने पवना नदीमध्ये सांडपाणी मिसळत असल्याबाबात महापलिकेस 9 डिसेंबरला नोटीस पाठवली होती. त्यात दहा दिवसांमध्ये अहवाल करण्याची सूचना केली होती. तळवडे, थेरगाव या पट्टयामध्ये विनाप्रक्रिया सांडपाणी सोडण्यात येत असल्याने त्यावर तातडीने कार्यवाही करण्याची नोटीस महापालिकेस देण्यात आली होती. ते दूषित पाण्याचे नाले बंद करावेत. दूषित् पाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडावे असे सांगितले होते. तसेच, त्यावर लवकरात लवकर प्रक्रिया करण्याबाबत बॅंक गॅरंटी घेण्यात आली आहे.
मात्र, तीन आठवडे उलटूनही महापालिकेच्या पर्यावरण विभागाने कोणत्याही प्रकाराचा तपशील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर केला नाही. त्याबाबत प्रदूषण मंडळ महापालिकेच्या सातत्याने संपर्कात आहे. नुकतेच, महापालिकेच्या पर्यावरण विभागाशी संपर्क करून त्या ड्रेनेजच्या कामाबाबत कार्यवाहीबाबत अहवाल मागवला आहे. मात्र, महापालिकेकडून अहवालच सादर केला जात नसल्याने प्रदूषण महामंडळा काय पावले उचलणार याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे.