मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आरेतील वृक्षतोडीवरून मोठे आंदोलन झाले होते. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे संबंधी मोठा निर्णय घेतला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आनंद व्यक्त केला आहे.
जितेंद्र आव्हाड म्हणाले कि, मित्रहो, आम्ही दिलेला शब्द जपला. आरेचे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्यासहित अनेक जणांनी आंदोलने केली तुरुंगात गेले. पण तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला. आपणा सर्वांचे अभिनंदन, असे त्यांनी म्हंटले आहे. तसेच संघर्षाचा विजय असो असा हॅशटॅगही दिला आहे.
मित्रहो…..
आम्ही दिलेला शब्द जपला….
आरे चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्या सहित अनेक जणांनी आंदोलने केली
तुरुंगात गेले पण तत्कालीन सरकार बधले नाही
परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला
अभिनंदन आपणा सर्वांचे#संघर्षाचा विजय असो pic.twitter.com/rZMD1NjqrK— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) September 3, 2020
दरम्यान, राखीव वन क्षेत्राचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे योग्य हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले. राखीव वन क्षेत्राबाबत कलम 4 लावण्यात येऊन त्यानुसार 45 दिवसांच्या कालावधीत नागरिकांकडून सूचना आणि हरकती मागविण्यात येतील.त्या सूचना व हरकती ऐकून घेऊन त्यानुसार वनामधून वगळायचे क्षेत्र निश्चित करण्यात येईल.
वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यासंदर्भात प्रस्तावना केली. दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांनी या प्रस्तावासंदर्भात पुढाकार घेतला होता.