नवी दिल्ली – विरोधकांनी संसदेचे कामकाज रोखून धरणे हा संसदेचा व लोकशाहीचा अवमान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते. त्यावर कॉंग्रेस नेते शशी थरूर यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, संसदेत चर्चा टाळणे, जबाबदारी टाळणे हाच खरा संसदेचा अवमान आहे.
आम्ही माहिती तंत्रज्ञान विभागाच्या स्थायी समितीच्या बैठकीत पेगॅसस प्रकरणाची सुनावणी घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यालाही सरकारकडून अडथळा आणला गेला. संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना आम्ही समन्स जारी केले होते, पण त्यांनाही तेथे उपस्थित राहु देण्यात आले नाही.
या प्रकरणात आम्ही लोकसभा सभापतींकडे रितसर तक्रार दाखल केली असून समितीपुढे हजर न राहणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस करण्यात आली आहे. आमच्या समितीपुढे पेगॅसस प्रकरणावर पुढील कार्यवाही केली जाईल असा विश्वासही थरूर यांनी व्यक्त केला.