मुंबई : करोना संकटकाळात राज्य शासन आपल्या परीने सर्वतोपरी सर्वसामान्यांसाठी मदत करत आहे. त्यासाठी गोरगरीब जनतेला रेशन दुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्य वाटपाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. दरम्यान, या वाटपात गैरप्रकार होऊ नये आणि त्यामुळे विनाकारण शासनाची होणारी बदनामी टाळावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सर्वच पालकमंत्र्यांना दिले आहेत.
राज्य सरकारकडून धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावे, वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचे तात्काळ निराकरण करावे आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी अशा प्रकारचे आवाहन अजित पवार यांनी पालकमंत्र्यांना पत्र लिहून केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशन दुकानांमधून पुरेसे अन्नधान्य उपलब्ध केले जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधले आहे.
शासनाने रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे. “राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा 3.87 लाख मेट्रिक टनांवरुन 7.74 लाख मेट्रिक टनांवर नेण्यात आला आहे. केसरी कार्डधारकांना 1.52 लाख मेट्रिक टनांचे अतिरिक्त धान्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
गरीब नागरिकांना पुरेसे धान्य मिळावे, धान्याचे, सुरळीत वाटप व्हावे, कुणीही उपाशी राहू नये, कुणाचीही तक्रार राहू नये याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तीश: लक्ष घालावे आणि अन्नधान्य वाटपातील तक्रारी दूर करण्याची जबाबदारी घ्यावी,” असे अजित पवार यांनी पत्रात म्हटले आहे.