पुणे – रिक्षा किंवा दोन्ही बाजूंनी उघड्या असणाऱ्या वाहनातून मुलांना शाळेत पाठवणे शक्यतो टाळावे. बंद वाहनातून नेतानाही आग लागल्यावर किंवा इतर संकटाच्या परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा हे मुलांना शिकवावे आणि दर तीन महिन्यांनी मुलांना प्रत्यक्ष प्रशिक्षणही द्यावे, असे ईसीएचे राष्ट्रीय केंद्रीय समिती सदस्य आदित्य तापडिया म्हणाले.
“अर्ली चाइल्ड असोसिएशन (ईसीए)’ने शाळा व्यवस्थापन आणि पालकांसाठी दक्षतेच्या दृष्टिकोनातून एक मार्गदर्शक नियमावली जाहीर केली. नुकत्याच झालेल्या परिषदेमध्ये ही नियमावली जाहीर करण्यात आली. मुलांना शाळेमध्ये पाठविताना आणि उतरविताना पालक आणि शिक्षकांनी न विसरता रजिस्टरवर नोंद करणे सक्तीचे करावे आणि ते नियमित पाळले जावेत. शाळेचे वाहन अधिकृत आहे की नाही याची पालकांनी खात्री करणे आणि शाळेनेही वाहनावर शाळेच्या नावाचा फलक लावणेही गरजेचे आहे. सर्व मुलांना शाळेत वा घरी सोडून आल्यावर तसेच मुलांना घ्यायला जाण्यापूर्वी संपूर्ण गाडी तपासली जाणे आवश्यक आहे. शिवाय कोणत्याही परिस्थितीत शाळेला कळवल्याशिवाय बसमधील मदतनिसाने बस सोडून जाणे अपेक्षित नाही, असे नियमावलीमध्ये नमूद करण्यात आले आहे. हे नियम अत्यावश्यक असल्याचे डॉ. रीता सोनावत यांनी सांगितले.