केजरीवालांची भूमिका
नवी दिल्ली – दिल्ली मेट्रोचा चौथा टप्पा दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारच्या वादामुळे गेली अनेक वर्ष प्रलंबीत आहे. तथापी कोणताही वाद न घालता जितक्या लवकर हा प्रकल्प सुरू करणे शक्य आहे तितक्या लवकर तो सुरू करावा अशी भूमिका आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरवाल यांनी घेतली आहे.
चौथ्या टप्प्यात सहा कॉरिडॉवर काम सुरू करावे अशी दिल्ली सरकारची भूमिका होती. पण केंद्र सरकारने तीनच कॉरिडॉर मंजुर केले आणि त्यातही त्यांनी त्यांच्या इच्छेनुसार बदल केले. त्यामुळे हा प्रकल्प वादात सापडला होता व हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. केंद्राच्या संकल्पनेनुसार तीन मार्गांच्या उभारणीचे काम त्वरीत सुरू करायला आमची हरकत नाही असे केजरीवाल सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले आहे. चौथ्या टप्प्याचे काम सुरू करण्यासाठी आम्हाला केंद्र सरकारने सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.