अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी झाले फरार, 19 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा
अकोले – अकोले तालुका पंचायत समितीचे गटविकास अधिकारी फरार झाल्यामुळे तालुक्यातील सेवानिवृत्तांना त्यांच्या हक्काचे मागील महिन्याचे सेवानिवृत्ती वेतन मिळाले नाही. येत्या 18 तारखेपर्यंत याबाबत उचित कारवाई न झाल्यास अकोले तालुका पंचायत समिती कार्यालयाला दि. 19 ऑगस्टला टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
आज अकोले तालुका पेन्शनर संघटनेच्यावतीने अकोले पंचायत समितीवर बैठा सत्याग्रह करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कार्यालय अधीक्षक वाघमारे यांच्याशी दीर्घकाळ चर्चा केली. 14 तारीख येऊनही पेन्शनर लोकांना सेवानिवृत्ती वेतन का मिळाले नाही? या व अन्य प्रश्नांची सरबत्ती त्यांच्यावर उडवली. त्यावेळी वाघमारे बचावाच्या पवित्र्यात होते. त्यांनी गटविकास अधिकारी येथे नाहीत, अशा प्रकारची माहिती संबंधित आंदोलकांना दिली.
आंदोलकांनी माहिती घेतल्यानंतर त्यांना विद्यमान गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे हे 31 जुलै पासून रजा न टाकता कोठे तरी फरार झाले असल्याचे सांगण्यात आले. तर काही कर्मचाऱ्यांनी त्यांची बदली झाली असल्याचे सांगितले. परंतू सेवानिवृत्त कर्मचारी बीडीओ फरार आहेत. याच म्हणण्यावर ठाम राहिले. त्यांच्यामुळे आमचे वेतन थकित झाल्याने आमचे हाल सुरू आहेत.अशा प्रकारची तक्रार संबंधित प्रतिनिधीकडे बोलताना केली.
प्रत्येक महिन्याचे सेवानिवृत्तीवेतन हे एक तारखेच्या आत जमा व्हावे. सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता 30 जुलै पूर्वी जमा झालेला नाही. पंधरा दिवस झालेले आहेत, गट विकास अधिकारी कार्यालयात नाहीत. पेन्शनरांमध्ये 45 टक्के हे आजारी, बिछान्यावर पडून आणि केवळ पेन्शनवरच जगत असल्याने त्यांचे हाल सुरू आहेत. अशा प्रकारची माहिती यावेळेस सेवानिवृत्त गटविकास अधिकारी भानुदास तिकांडे,पेन्शनर संघटनेचे नेते सोन्याबापू वाकचौरे गुरुजी, विठ्ठलराव आभाळे, रा रा भांगरे, लक्ष्मणराव सदगीर आदीनी दिली.
यासंदर्भात जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी वासुदेव सोळुंके यांच्याशी आम्ही दूरध्वनीवर संपर्क साधला. परंतू त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. असा आरोप करून सेवानिवृतांचे अशा अधिकाऱ्यांमुळे हाल होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात आज सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, पाटबंधारे विभाग कर्मचारी, आरोग्य कर्मचारी, कृषी कर्मचारी आदींचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या सर्वांनी येत्या 18 तारखेपर्यंत पेन्शन हातात न पडल्यास 19 तारखेला आम्ही पंचायत समिती कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा दिला आहे.