शेतकरी, भाजी विक्रेत्यांची भावना
नगर – देशाची अर्थव्यवस्था कृषक घटकांवर अवलंबून आहे. मात्र, आज देशातील शेतकरी हवालदिल झालेला दिसून येतो. शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून अनेक पक्ष आपला जाहीरनामा तयार करतात.
काही पक्ष हे केवळ शेतकरी पक्ष आहे. ते शेतकऱ्यांचे पक्ष म्हणून मिरवतात. असं असलं तरीही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत, तसेच आहे. पक्ष, नेते हे निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांला हिरवं स्वप्न दाखवतात, आश्वासन देतात, मात्र निवडून आल्यावर शेतकऱ्याच्या तोंडाला फक्त पान पुसतात.
देशाची आर्थिक परिस्थिती ज्या कृषक घटकांवर आधारित आहे, त्या शेतकऱ्यांशी साधलेला हा संवाद. या संवादातून पुढे आल्या, शेतकऱ्यांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा….
नेत्या लोकांना फक्त निवडणुका असल्या की, शेतकरी आठवतो. बाकी दिवस शेतकरी मेला की, जिवंत आहे, कुणाला काही देणं घेणं नाही. आज शेतकऱ्याच्या मालाले भाव नाही. आम्ही स्वतः शेत पिकवून भाजीपाला विकतो, तर लोक भाजीपाला घेतांना घासाघीस करतात. शेतकऱ्याचा माल हराशीत अर्ध्या किमतीत भाजीपाला व्यावसायिक विकत घेतात. शेतकऱ्याला त्याच्या घामाचा दाम मिळायला पाहिजे. पण, याच्यावर कोणी बोलत नाही.
कमल कोल्हे शेतकरी – भाजीपाला विक्रेते
आमची स्वतःची काही शेती आहे. एक मुलगा शेती करतो. शेतीत काही परवडत नाही म्हणून मी रोज मार्केट यार्ड म्हणून भाजीपाला विकत घेऊन विकते. आज शेतकऱ्याची परिस्थिती किती हलाखीची आहे. पाऊस साथ देत नाही. पिकाले भाव नाही. कर्ज वाढत चाललं. शेतकऱ्याचा हिताचा विचार कुठलं सरकार करत नाही, की कुठला नेता करत नाही. कर्जमाफी करू, असं सरकार म्हणते. पण, प्रत्यक्षात झाली का कर्जमाफी? शेतकरी रोज मरतो, एक दिवस शेतकरी मेलाच तर लोकं खातील काय?
रखमाबाई फरताडे भाजीपाला विक्रेते
मी स्वतः शेतकरी आहे. कांद्याला भाव नाही. कांद्याने फक्त शेतकऱ्याला रडवलं. शेतकऱ्याच्या घामाच्या पैशावर सगळे डल्ला मारतात. शेतकऱ्याची दिवसा लुबाडी होते. शेतकऱ्याच्या गळ्याला सरकार, नेते, भांडवलदार पक्का फास लावतात. सरकारची शेतकरी विरोधी भूमिका एक दिवस शेतकऱ्याला संपवून टाकील. स्थानिक विकास होईल, तो होतच आहे. पण, शेतकऱ्याच्या विकासाचं काय? मले सांगा, पिकाले भाव नसल्यावर पोरीचं लग्न, पोराचं शिक्षण, बहिणीची दिवाळी कशी करायची शेतकऱ्याने?
सखाराम म्हस्के शेतकरी
सरकारने मूलभूत सुविधा पूर्ण कराव्या. पण, या बरोबर शेतकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत, त्या लक्षात घेऊन सोडवाव्या. शेतकरी जगला तरच देश जगेल. शेतकऱ्यांच्या शिकल्या – सवरलेल्या मुलाला नोकरी द्यावी.
बाळासाहेब अवसरकर कडधान्य विक्रेते
प्रश्न फार नाहीत. पण, ते सोडवले गेले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले गेले पाहिजे. मालाला भाव, ही तर एक शेतकऱ्यांची प्राथमिक मागणी आहे. पण, मिळतो का भाव ? बाकी गाडगीळ पटांगणात आम्ही माल विकतो. इथं पावसाळ्यात किती चिखल असतो. किती सगळी अस्वच्छता आहे ? याकडे कुणाचं लक्ष नाही.
ओंकार राऊत कडधान्य विक्रेते
भाजीपाल्याला भाव नाही. माल हराशीत विकावा लागतो. शेतीच्या खर्चात जावक जास्त झाली, अन् आवक कमी झाली. कुठला नेता शेतकऱ्याची बाजू घेत नाही. कष्टकरी शेतकरी जगला पाहिजे असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव द्या. मग कशाला मागतो, शेतकरी कर्जमाफी. फसव्या योजना नका आखू शेतकऱ्यांसाठी. शेतकऱ्याला मदतच करायची असेल तर फक्त पिकाचं नुकसान झालं तर तर पीक भरपाई द्या. इरिगेशसाठी मदत करा. शेतकऱ्याच्या हिताची भूमिका सरकारने घ्यावी. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्याचे प्रश्न सोडवले पाहीजेत. बळीचं राज्य आलं पाहीजे.
सुनिता भापकर भाजीपाला विक्रेते