प्रहार संघटनेच्या पवित्र्याने शहरात खळबळ
कराड – कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांच्या दालनाला प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी टाळे ठोकले. निवेदन देण्यासाठी पालिकेत आल्यानंतर नगराध्यक्ष उपस्थित नव्हत्या. दोन तास वाट पाहूनही त्या आल्या नाहीत; परंतु भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी त्या गेल्याचे समजताच संतप्त कार्यकर्त्यांनी पालिकेतील कर्मचाऱ्याला अध्यक्षांच्या दालनात कोंडून बाहेरून टाळे ठोकले. या धक्कादायक प्रकाराची माहिती समजताच मुख्याधिकारी यशवंत डांगे यांनी तात्काळ पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी टाळे काढले. या प्रकरणी पालिकेच्यावतीने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.
शहरातील विविध भागातील व वाखाण परिसरातील महत्त्वाच्या समस्या सोडवाव्यात यासाठी नगराध्यक्ष रोहिणी शिंदे यांना निवेदन देऊन प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याशी चर्चा करायची होती. हे कार्यकर्ते पालिकेत पोहोचले, तेव्हा नगराध्यक्ष उपस्थित नसल्याचे त्यांना समजले. त्यांना भेटूनच निवेदन देण्याचा पवित्रा कार्यकर्त्यांनी घेतला.
त्यांनी सुमारे दोन तास दालनाबाहेर अध्यक्षांची वाट पाहिली. शेतकऱ्यांची कर्जमाफीत फसवणूक व महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ भाजपने तहसील कार्यालयासमोर केलेल्या धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी नगराध्यक्ष सकाळपासून गेल्याचे या कार्यकर्त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी नगराध्यक्षांना जनतेच्या कामांचे महत्त्व नसल्याचा आरोप केला. त्यांनी पालिकेतील कर्मचाऱ्यास नगराध्यक्षांच्या दालनाला कोंडून टाळे ठोकले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती.
प्रहारच्या चार कार्यकर्त्यांवर गुन्हा
नगराध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकल्याप्रकरणी संघटनेचे सतीश विष्णू पाटील (रा. मंगळवार पेठ, कराड) व अन्य तीन कार्यकर्त्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. नगराध्यक्षांचे स्वीय सहाय्यक श्रीपाद देशपांडे यांनी फिर्याद दिली आहे. संघटनेचे कार्यकर्ते निवेदन देण्यासाठी आले असता नगराध्यक्ष पक्षाच्या नियोजित कार्यक्रमासाठी बाहेर गेल्या होत्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी नगराध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकले. यात शिपाई यशवंत साळुंखे दालनात अडकून पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.