जामखेड -जामखेड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा कोरोनाने हातपाय पसरवायला सुरुवात केली असून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संपर्कातील क्लोज कॉन्टॅक्टबद्दल माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्यामुळे प्रशासनाला क्लोज कॉन्टॅक्ट असणाऱ्या व्यक्ती क्वाॅरंटाइन करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा विळखा वाढतच चालला आहे. काेरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. जामखेड तालुक्यातही काही वेगळी परिस्थिती नाही. सध्या तालुक्यासह शहरात सुरू कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून काल पर्यंत रॅपीट अँटीजेन तपासणीत 48 रुग्ण कोरोनाबाधित सापडलेले आहेत तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 5 वर आली आहे त्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. कोरोना रुग्ण हे संपर्कातील लोकांची माहिती देत नसल्यामुळे महसूल प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. नागरिकांनी आता या गोष्टीला गांभीर्याने घेण्याची गरज असून,नागरिक प्रशासनाला सहकार्य करण्याच्या बाबतीत दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संपर्कातील क्लोज कॉन्टॅक्ट क्वारंटाईन होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.कोरोना रुग्णांच्या क्लोज कॉन्टॅक्ट मधील कोण कोण आहे, ही माहिती कोरोना रुग्ण देत नसल्यामुळे प्रशासन फोन कॉल हिस्ट्री व इतर लोकांकडून माहिती घेऊन लोकांचा शोध घेत आहे. त्यानंतर संबंधित व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत का, ही तपासणी करुन स्वॅब नमुने घेणे अथवा क्वाॅरंटाइन करणे ही उपाययोजना करत आहे.
जामखेडचा कोरोना बाधित रुग्णांचा आकडा वाढला आहे. प्रशासन खबरदारीच्या उपाययोजना राबवित आहे. बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू आहे. त्यांनाही तात्काळ ताब्यात घेतले जाणार आहे. त्यांची तपासणी करुन आवश्यक्तेनुसार विलगिकरण कक्षात ठेवून संसर्ग रोखला जाणार आहे. याकरिता बाधित रुग्णांनी संपर्कातील व्यक्तींची माहिती प्रशासनाला तात्काळ देण्याची आवश्यकता आहे. मात्र तस होत नाही. ही माहिती लपवली जात आहे. म्हणून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. मात्र तात्काळ ‘रिझल्ट’ समजणार असल्याने कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी स्वःत होऊन पुढे यायला हवे, असे आवाहन तहसीलदार नाईकवाडे यांनी केले आहे.
शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण किंवा त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची नावे देऊन प्रशासनास सहकार्य करणे अपेक्षित आहे. किंवा पॉझिटिव्ह रुग्णांच्या, त्यांच्या कुटुंबाच्या कोणी संपर्कात आले असेल तर नागरिकांनी स्वतः पुढे यावे, यासाठी कोणालाही घाबरण्याची गरज नाही. अशा व्यक्तींची ग्रामीण रुग्णालयात तात्काळ रॅपीट अँटीजेन टेस्ट घेतली जाईल. त्यांचा रिपोर्ट ३० मिनिटात येतो. यात असे व्यक्ती निगेटिव्ह असतील तर चांगलेच आहे. जर कोणी पॉझिटिव्ह आले तर त्यांच्यावर लगेच योग्य उपचार सुरू होतील. तसेच या गोष्टी वेळेवर झाल्या तर कोणाच्याही जीवितास धोका होणार नाही. बाधीत रुग्णाचे संपर्क शोधण्यासाठी प्रशासन संपूर्ण प्रयत्न करत आहे. यात सहकार्याची अपेक्षा तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केली आहे.