मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या राज्यातील चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात 17 मतदारसंघांमध्ये मतदान पार पडले. राज्यात सरासरी 57 टक्के मतदानाची नोंद झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. तर राज्यात चार टप्प्यात सरासरी 60.68 टक्के मतदान झाले.
चौथ्या टप्प्यातही ग्रामीण भागातील नागरिकांनी मतदानासाठी मोठा उत्साह दाखवल्याचे आणि शहरी भागातील नागरिकांनी मतदानाकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून आले आहे. राज्यात चौथ्या टप्प्यात उत्तर मुंबई, उत्तर-पश्चिम मुंबई, उत्तर-पूर्व मुंबई, उत्तर-मध्य मुंबई , दक्षिण-मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, भिवंडी, कल्याण, ठाणे, पालघर, नंदुरबार, मावळ, धुळे, शिर्डी , शिरुर, नाशिक, दिंडोरी या मतदारसंघात मतदान झाले.
राज्यात एकूण 3 लाख 9 हजार दिव्यांग मतदार नोंदणी झाल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी 7 लाख 50 हजार कर्मचाऱ्यांनी आपले योगदान दिले. तर 1 लाख 4 हजार पोलिसांनीही यामध्ये आपली कामगिरी बजावली.
निवडणुकीदरम्यान एकूण 157 कोटींचा मुद्देमाल निवडणूक आयोगाने जप्त केला आहे. यामध्ये 53 कोटी 8 लाखांची रोख रक्कम, 70 कोटींचे सोने, 34 कोटींची दारुचा समावेश आहे. तसेच यासंदर्भात 17 हजार 588 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.