नवी दिल्ली – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिल्यानंतर पुन्हा एकदा राज्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते संबित पात्रा यांनी रिया चक्रवर्तीच्या नावावरून राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. सुनने में आया है महाराष्ट्र सरकार अब रो रिया है! अशा शब्दात पात्रा यांनी टीका केली आहे.
प्रकरणाची सुनावणी सुरु झाल्यानंतर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने हा तपास करण्याची परवानगी सीबीआयला दिली व त्यानंतर राज्य सरकारला अनेकांनी फटकारले. याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटले. त्यातच पात्रा यांनी केलेले ट्विट चांगलेच गाजत आहे.
या बाबतचे सर्व पुरावे सीबीआयकडे सोपवण्याचे आदेशही न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले. पाटण्यामध्ये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास मुंबई पोलिसांकडे वर्ग करा, अशी मागणी एका याचिकेच्या माध्यमातून सुशांतची मैत्रीण व अभिनेत्री रिया चक्रवर्तीने केली होती. त्यावर न्यायालयानं निकाल दिला. दरम्यान, यानंतर अनेक स्तरातून राज्य सरकारवर टीका सुरू झाली आहे.
दरम्यान, या प्रकरणात सीबीआय तपासाची गरज नाही असे सातत्याने सांगत असलेल्या अनिल देशमुख यांच्याकडून विरोधकांनी राजीनामा देण्याचीही मागणी केली आहे. मुंबई पोलीस आयुक्तांनी दोन महिने एफआयआर देखील दाखल करून घेतली नाही, यावरुनच सुशांतला न्याय मिळणार नाही हे उघड आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे एक अन्य नेते किरीट सोमय्या यांनीही टीका केली. आता पात्रा यांनी केलेल्या टीकेला राज्य सरकार काय प्रतिक्रीया देते याकडे लक्ष लागले आहे.