सिडनी – विलगीकरणातील सवलतीवर चर्चा सुरू असतानाच ब्रिस्बेनमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत झापाट्यानेवाढ होत असल्यामुळे भारत व यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यात येथे होणारी चौथी कसोटी सिडनीतच हलवली जाणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. विलगीकरणात सवलत मिळावी यासाठी बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला पत्र लिहिले आहे. मात्र, अशी सवलत आता मिळण्याची शक्यताखूपच धूसर बनली आहे.
आम्हाला विलगीकरणात सवलत हवी अगदी आयपीएलमध्ये होती तशी. अन्यथा आमचे खेळाडू ब्रिस्बेनमध्ये खेळणार नाहीत, अशी भूमीका बीसीसीआयनेघेतली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आल्यापासून आम्ही विलगीकरणाचे सर्व कडक नियम पाळले आहेत. पण, आता यापुढे आम्हाला कडक विलगीकरण पाळता येणार नाही, असे बीसीसीआयने या पत्रात स्पष्टपणे नमूद केले आहे.
ब्रिस्बेनमध्ये करोनाचा धोका वाढत असतानाच बीसीसीआयच्या भूमीकेमुळे आता 15 जानेवारीपासून सुरु होणारी मालिकेतील चौथी कसोटी अडचणीत आली आहे. विलगीकरणाच्या मुद्यावरून दोन्ही मंडळात चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर बीसीसीआयने विलगीकरणाच्या कठोर अंमलबजावणीतून आम्हाला सवलत मिळाली तर आणि तरच आमचे खोडू ब्रिस्बेनला सामना खेळतील असा स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे.
भारताने सिडनीत एक विलगीकरण पार पाडले आहे. ते पाळत असताना कुठलेही नियम तोडलेले नाहीत. मग, आता नव्याने कडक विलगीकरणाची आवश्यकता नाही. आमची साधी सोपी एकच मागणी आहे की आम्हाला खेळाडूंनी आयपीएलमध्ये पाळले तसे बायोबबल सुरक्षा हवी आहे. आमच्या खेळाडूंना हॉटेलमध्ये एकत्र जेवण करण्याची सवलत हवी, त्याचबरोबर त्यांना हॉटेलमध्ये एकत्र संघ नियोजन बैठक घेण्यास मान्यता हवी. या मागण्या फार काही मोठ्या आहेत असे आम्हाला वाटत नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
तिसरी कसोटी सुरू होण्याच्या आदल्या दिवशी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे याने देखिल हॉटेलच्या रुममध्ये राहणे किती कठिण आहे याची कल्पना करवत नाही. सिडनी शहरात एकीकडे सर्व व्यवहार सुरळीत सुरू असताना आम्ही इकडे हॉटेलमध्ये राहणे समजण्यापलिकडचे आहे, असे स्पष्टपणे आपले मत मांडले होते. आता क्वीन्सलॅंड सरकार आपल्या मुद्यांवर ठाम राहिल्यास आणि बीसीसीआयच्या मागण्यांना विरोध केल्यास चौथी कसोटी सिडनीतच होण्याची शक्यता वाढली आहे.