नवी दिल्ली – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका 17 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेत रोहित शर्मा खेळण्याची शक्यता जवळजवळ मावळली असल्याने त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यात ते मधल्या फळीतील आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरसोबत चर्चा करताना दिसत आहे. यामुळे कसोटी मालिकेसाठी त्याच्या संघात समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे.
ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांना कसोटी मालिकेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. तसेच अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्येही त्यांच्या समावेशबाबत अद्याप निश्चितपणे सांगता येत नसल्याने ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यास मुकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आयपीएल खेळताना रोहितच्या गुडघ्याचे स्नायू दुखावले होते. त्यातून रोहित आता सावरत आहे. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत. रोहितप्रमाणेच वेगवान गोलंदाज ईशांत शर्मादेखील दुखापतग्रस्त झाला होता. त्याचीदेखील कसोटी संघात निवड करण्यात आली असून तो एनसीएमध्ये सराव करत आहे.