भारतीय संघासमोरील अडचणीत वाढ
नवी दिल्ली – ऑस्ट्रेलिया दौरा सुरू होण्याच्या काही दिवस आधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि अनुभवी वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा यांना कसोटी मालिकेच्या सुरुवातीच्या दोन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. तसेच अखेरच्या दोन कसोटी सामन्यांमध्येही त्यांच्या समावेशबाबत अद्याप निश्चितपणे सांगता येत नसल्याने ते ऑस्ट्रेलिया दौऱ्यास मुकणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
आयपीएल खेळताना रोहितच्या गुडघ्याचे स्नायू दुखावले होते. त्यातून रोहित आता सावरत आहे. तो सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) फिटनेस ट्रेनिंग घेत आहेत. रोहितप्रमाणेच वेगवान गोलंदाज ईशांत शर्मादेखील दुखापतग्रस्त झाला होता. त्याचीदेखील कसोटी संघात निवड करण्यात आली असून तो एनसीएमध्ये सराव करत आहे.
बीसीसीआय बोर्डाच्या सूत्रांनी मंगळवारी सांगितले की, रोहित शर्मा आणि ईशांत शर्मा यांचा अहवाल एनसीएने दिला आहे. या दोन्ही खेळाडूंना पूर्णपणे फिट होण्यासाठी आणखी किमान 3 ते 4 आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. तसेच करोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे दोन्ही खेळाडूंना ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
याबाबत ऑस्ट्रेलिया सरकारला कळविण्यात आले असून क्वारंटाईनच्या काळात त्यांना सराव करण्यास परवानगी देण्याबाबत विचारणा करण्यात आली असल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती आहे. पुढील वर्षाच्या जानेवारी महिन्यात अनुष्का शर्मा आणि विराट आई-बाबा होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर विराटने बीसीसीआयकडे पॅटर्निटी लिव्हसाठी अर्ज केला होता. बीसीसीआयने विराटची रजा मंजूर केली आहे. यामुळे विराट पहिला कसोटी सामना खेळल्यानंतर मायदेशी परतणार आहे.
अशात आता संघातील दोन अनुभवी खेळाडू (रोहित आणि ईशांत) पहिले दोन सामने खेळण्यासाठी उपलब्ध नसल्याने कांगारूविरुद्धची मालिका जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रवास अजून खडतर होणार आहे. विराट, रोहित, ईशांत या अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारतीय संघाची संपूर्ण मदार उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा या दोघांच्या खांद्यावर असणार आहे.
दरम्यान, भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी सांगितल्याप्रमाणे दोन्ही खेळाडूंना जास्त दिवस भारतात राहावे लागले तर आपल्या अडचणी वाढू शकतात. ट्रेनिंग पूर्ण करून दोघे ऑस्ट्रेलियात येणार. त्यानंतर क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करतील आणि त्यानंतरच दोन्ही खेळाडू कसोटी मालिका खेळण्यासाठी उपलब्ध होतील, असे शास्त्री यांनी सांगितले होते. यामुळे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली आहे.