सिडनी – आक्रमक मनोवृत्तीचा फलंदाज असलेल्या आणि तितक्याच कल्पकतेने संघाचे नेतेपद सांभाळणाऱ्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीत रोहित शर्माला कर्णधार व फलंदाज म्हणून स्वत:ची क्षमता सिद्ध करण्याची नामी संधी आहे, असे मत निवृत्त ऑस्ट्रेलियन जलद गोलंदाज ग्लेन मॅकग्रा याने व्यक्त केले आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात डेरेदाखल झाली असून कर्णधार विराट कोहली एका कसोटीनंतर पितृत्व रजेवर जाणार आहे. त्यानंतर एकदिवसीय मालिका आणि टी-20 मालिकेसाठी रोहित शर्माकडे संघाची धुरा असेल.
मॅकग्रा पुढे असेही म्हणाला की, यावेळी पुजारासाठी ऑस्ट्रेलिया दौरा हा सहज सोपा राहणार नाही. अशातच रोहित शर्माही अग्रणी फलंदाज आहे. त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. कोहली भारतात परतल्यानंतर त्याच्याकडे संधी असेल. आपण काय करू शकतो, हे क्रिकेटजगताला दाखवण्याची त्याच्याकडे संधी आहे. टीम इंडियात सध्या दर्जेदार फलंदाजांचा भरणा असल्याने कोणालाही एकाच खेळाडूवर लक्ष केंद्रित करता येणार नाही. भारताची फलंदाजी मजबूत आहे. यात पुजारा, अजिंक्य रहाणे आणि लोकेश राहुल यासारख्या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे, असेही मॅकग्रा म्हणाला.
विराटसारख्या दर्जेदार व अव्वल खेळाडूचे संघातून परत मायदेशी जाणे टीम इंडियासाठी नुकसानदायक ठरणार आहे. कारण तो मैदानावर दुहेरी भूमिका वठवत असतो. एक फलंदाज म्हणून आणि दुसरा कर्णधार म्हणून मैदानावर सतत ऊर्जा कायम ठेवण्याचे त्याचे काम असते. तिकडे स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर परतल्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ मजबूत झाला आहे. अशात यजमानांकडे हिशेब चुकता करण्याची संधी असल्याचे मत मॅकग्राने व्यक्त केले.
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात चार कसोटी, तीन वन डे आणि तीन टी-20 सामने खेळायचे आहेत. याआधी वर्ष 2018 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी कसोटी सामन्यात 3-1 ने दणकून मात दिली होती. त्यावेळी स्मिथ आणि वॉर्नर चेंडू कुरतडल्यामुळे प्रतिबंधाचा सामना करत होते. त्यानंतरही ऑस्ट्रेलियाला मालिकेत भारताने अजिबात डोके वर काढू दिले नव्हते.