मुंबई – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेत नवोदित मयंक आगरवाल खेळणार हे नक्की झाले आहे. कारण सध्या तो फलंदाजीत मोठ्या खेळी करत आहे. जर रोहित शर्मा कसोटीमध्ये उपलब्ध होऊ शकणार नसेल तर मयंकला सलामीवीर म्हणूनच खेळवावं. तसेच दुसरा सलामी फलंदाज म्हणून इतर खेळाडूच्या फॉर्मचा विचार करण्यात यावा, असं मत विक्रमवीर फलंदाज सचिन तेंडुलकर यानं व्यक्त केलं आहे.
विस्फोटक फलंदाज मयंक आगरवालची पहिल्यांदाच तिन्ही प्रकारच्या भारतीय संघात निवड झाली आहे. त्यावर सचिनने हे मत व्यक्त केल्यानं त्याचं महत्त्व अधोरेखित होत आहे.
मयंकने नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करत सर्वांचे लक्ष वेधलं होतं. मयंकनं 11 सामन्यात 156.4 च्या स्ट्राइकरेटनं 424 धावा चोपल्या होत्या. एकदिवसीय आणि टी-20 सामन्यात सलामी फलंदाज म्हणून शिखर धवन खेळणार हे तर नक्की आहे. पण त्याच्यासोबत आगरवाल, राहुल किंवा शुभमन गिल यांच्यापैकी कोण येणार, याबाबत प्रश्नचिन्ह असताना, कसोटी सामन्यात सलामीवीर म्हणून स्वत: सचिन तेंडुलकरने मयंकचं समर्थन केलं आहे.
विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर मायदेशी परतणार आहे. त्याच्या अनुपस्थितीचा भारतीय संघाला फटका बसू शकतो. पण भारताची बेंच स्ट्रेंज मजबूत आहे. विराट कोहलीच्या अनुपस्थितीत इतर खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची मोठी संधी आहे. त्यामुळे भारताचे आव्हान मालिकेत कायम राहणार आहे, असे सांगून सचिन म्हनाला की, कसोटी सामन्यात चेतेश्वर पुजाराची उपस्थिती भारतीय संघासाठी महत्त्वाची आहे. पुजारा-विराट या जोडगोळीनं भारताला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाबाबत सचिन म्हणाला की, यावेळेस ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजीचा क्रम तगडा वाटतोय. स्मिथ, वॉर्नर आणि लाबुशाने ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. दोन सीनिअर खेळाडू आणि लाबुशेन यांच्या उपस्थितीमुळे ऑस्ट्रेलिया संघाची फलंदाजीला अधिक बळकटी आली आहे. तयारीबाबत बोलाल तर भारतीय संघही कोणतीही कमी सोडणार नाही. बॉर्डर-गावसकर चषक भारत आपल्याकडेच राखेल, असेही सचिन म्हणाला.