सिडनी – करोना व्हायरसच्या फैलावामुळे पसरलेल्या कोविड-19च्या प्रादुर्भावाच्या सावटाखाली भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा सुरू असताना आता प्रत्यक्ष मालिका सुरू व्हायची वेळ आली, तरीही कोणता खेळाडू कोणत्या प्रकारात खेळणार आणि कोण फलंदाज कोणत्या क्रमांकावर खेळणार, याबाबत अजूनही अनिश्चिततेचे वातावरण असल्याचे दिसून येत आहे.
अशातच रोहित शर्मा आणि ईशांत शर्माच्या कसोटी खेळण्याबाबतची साशंकताही वाढत असल्याने संघ व्यवस्थापनासमोर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. त्यातच अनेक आजी-माजी खेळाडू संभाव्य संघाबाबत जाहीर मतप्रदर्शन करत असल्याने गोंधळात भरच पडत असल्याचे चित्र आहे. येत्या शुक्रवारपासून या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना सिडनी येथे होणार असून त्यादृष्टीने आता काही निर्णय घेणे संघव्यवस्थापनाला भाग पडणार आहे.
कुलदीप यादव आणि यजुवेंद्र चहल यांच्याबाबतही संघाला गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. मालिकेत दोघांनाही संधी द्यायची की दोघांपैकी एकाला संधी द्यायची, तर नक्की कोणाला? वर्ष 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कुलदीपने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि कोहलीचा सर्वाधिक विश्वासही त्याच्यावरच असल्याचे सांगितले जाते. त्याच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या आयपीएलमध्ये चहलने 21 विकेट्स घेत आपण फॉर्मात असल्याचे सिद्ध केले आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियातील उसळत्या विकेट्स आणि वेगवान आऊटफिल्ड असलेल्या मैदानात चहल की यादव की दोघेही, हे ठरवणे अवघड जाणार आहे.