ऍडलेड – ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीयाला शतक पूर्ण करता आले नाही. मात्र, तरीही त्याने भारतीय क्रिकेटमधील 51 वर्ष जुना विक्रम मोडला. पहिल्या दिवशी विराटने 74 धावा करताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी सामन्यात 851 धावा केल्या. भारती कर्णधारकडून करण्यात आलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या आहेत.
याआधी हा विक्रम मन्सूर अली खान पतौडी दीयांच्या नावावर होता. त्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार म्हणून 829 धावा केल्या होत्या. त्यांनी 11 कसोटी सामने खेळताना 43.63 च्या सरासरीने ही कामगिरी केली होती. त्यात एका शतकाचाही समावेश होता. त्यांनी या 11 कसोटी त्यांनी 1964 ते 1969 या कालावधीत खेळल्या होत्या.
कोहलीने केवळ पतौडी यांचाच विक्रम मागे टाकला नाही तर त्याने बॉर्डर-गावसकर स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारा भारतीय कर्णधार बनण्याचाही पराक्रम केला. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या 813 धावांच्या कामगिरीला मागे टाकले.
कोहलीने ऍडलेडवर गुरूवारी फटकावलेल्या अर्धशतकासह या मैदानावर 500 धावा करण्याची अनोखी कामगिरीही नोंदवली. एकाच मैदानावर 500 कींवा त्यापेक्षा जास्त धावा केलेल्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व व्हिव्हिएस लक्ष्मणनंतर तिसरे स्थान कोहलीने पटकावले आहे. सचिनने सिडनीच्या मैदानावर 785 तर, लक्ष्मणने 589 धावा केल्या आहेत.