रोहितबाबतही लवकरच निर्णय
बेंगळुरू – भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याची दुखापत पूर्ण बरी होण्यासाठी किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार असून त्यामुळेच त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागत आहे, अशी माहिती बीसीसीआयने जाहिर केली आहे.
कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर पालकत्व रजा घेत मायदेशी परतणार आहे. त्यातच इशांतच्या दुखापतीमुळे माघरीच्या वृत्तामुळे आणखीनच चिंता निर्माण झाली आहे. आता त्यातही 11 डीसेंबरला रोहित शर्माची तंदुरुस्ती चाचणी होणार होती. मात्र, आता त्याच्या वडीलांना करोनाची बाधा झाल्यामुळे रोहितलाही या मालिकेत सहभागी होता येणार नसल्याचे सांगितले जात आहे.
कसोटी मालिकेसाठी या दोन्ही खेळाडूंना संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, आता रोहितच्या जागी श्रेयस अय्यरला तर, इशांतच्या जागी टी. नटराजनला संधी मिळणार आहे. इशांत लवकरच पूर्ण तंदुरुस्त ठरेल असेही व्यक्त केले जात होते. मात्र, आता त्याची दुखापत इतक्या कमी कालावधीत बरी होणार नसल्याचे स्पष्ट झाल्यामुळे भारतीय संघाला जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांच्यासह नटराजनवरच अवलंबून राहावे लागणार आहे. दुसरीकडे रोहित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत सराव करीत आहे.