सिडनी – यजमान ऑस्ट्रेलिया व भारत यांच्यातील कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी आजपासून दिवस-रात्र तसेच गुलाबी चेंडूंवर खेळला जाणाऱ्या सराव सामन्याला सुरुवात होणार आहे. या तीन दिवसीय सामन्यात दोन्ही संघांना कसोटीपूर्व सरावाची संधी मिळणार आहे.
दोन्ही देशांच्या अ संघांदरम्यानचा पहिला सराव सामना अनिर्णित अवस्थेत संपला होता. आजपासून सुरू होत असलेल्या सामन्यात भारतीय संघ हनुमा विहारी व कुलदीप यादव यांच्यासह राखीव खेळाडूंनाही खेळण्याची संधी देणार आहे. विशेषतः वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, महंमद शमी व उमेश यादव यांनाही गुलाबी चेंडूवर गोलंदाजी करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
भारतीय संघाने मायदेशात दिवस-रात्र पद्धतीने कसोटी सामना खेळला असला तरीही ऑस्ट्रेलियात भारतीय संघ पहिल्यांदाच असा सामना खेळत आहे. या सामन्यातील सराव त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या दोन संघांदरम्यानचा कसोटी मालिकेतील पहिला सामना ऍडलेडमध्ये येत्या 17 तारखेपासून सुरू होणार असून त्यापूर्वी भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना येथील वातावरण तसेच खेळपट्टीचे स्वरूप अनुभवता येणार आहे.
पहिल्या सराव सामन्यात संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेने केले होते. या सामन्यात भारतीय संघाने द्विशतकी मजल मारल्यानंतर यजमान संघानेही त्रिशतकी मजल मारली होती. या सामन्यात वेगवान गोलंदाज उमेश यादवने चमकदार कामगिरी केली होती. मात्र, कसोटी संघातील रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव यांना या सामन्यात सरस कामगिरी करावी लागणार आहे.
कोहली माघार घेणार
भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली या सराव सामन्यातून माघार गेणार असल्याचे सांगितले जात आहे. एकदिवसीय व टी-20 मालिकेनंतर त्याला विश्रांती मिळालेली नव्हती. त्याला सराव सामन्यात खेळण्यापेक्षा आपल्या तंदुरुस्तीवर भर देण्याची इच्छा आहे. त्यामुळे या सराव सामन्यातही रहाणेकडेच संघाचे नेतृत्व राहणार आहे.
भारतीय संघाची फलंदाजी कागदावर जरी भक्कम वाटत असली तरीही सिडनीच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मिळणारी मदत पाहता त्यांना सावधपणे खेळ करावा लागणार आहे. एकदिवसीय तसेट टी-20 मालिका संपल्यावर लगेचच हा सराव सामना होत असल्याने विनाकारण आक्रमक फलंदाजीचा धोका पत्करणे भारतीय संघासाठी नुकसानकारक ठरणार आहे. त्यामुळे खेळाडू मर्यादित षटकांच्या सामन्यांच्या मानसिकतेतून जितके लवकर बाहेर येतील तितक्या लवकर त्यांची कामगिरी सरस होणार आहे. या सामन्यात कर्णधार रहाणे व चेतेश्वर पुजारा यांची कामगिरी कशी होते यावरच आगामी कसोटी मालिकेतील भारतीय संघाचे यश अवलंबून राहणार आहे.
पुजाराने चांगली खेळी करत पहिल्या सराव सामन्यात चमक दाखवली होती. त्यातच रहाणेने दमदार शतकी खेळी करत आपण भरात आल्याचेही सिद्ध केले होते. त्यांच्या जोडीला यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहानेही अर्धशतकी खेळी करत आपली संघातील दावेदारी मजबूत केली आहे. पृथ्वी शॉ व शुभमन गील यांच्या कामगिरीवरही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांचे लक्ष असेल.
ऑस्ट्रेलिया संघाबाबत बोलायचे झाले तर त्यांच्याकडेही सलामीचा फलंदाज तसेच मधल्या फळीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे या सामन्यात तसेच पहिल्या कसोटी सामन्यातही खेळू शकणार नसल्याने कसोटी संघाचा कर्णधार टीम पेनी याला नवोदित खेळाडूंना संधी देत त्यांचा खेळ पाहावा लागणार आहे. पहिल्या सराव सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी केलेल्या कॅमेरून ग्रीन या सामन्यात कशी फलंदाजी करतो याकडे त्याचे लक्ष राहणार आहे.
सीन अबॉट, जो बर्न्स, अलेक्स केरी, हॅरी कॉनवे मार्कस हॅरिस यांच्याकडून फलंदाजी कशी होते ते पाहून वॉर्नरच्या जागी कोणाला पहिल्या कसोटीत संधी द्यायची हे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांना ठरवावे लागणार आहे. त्यांची गोलंदाजी त्या मानाने अननुभवी आहे. त्यातही त्यांचा नवोदित गोलंदाज मायकेल स्वेपसन याने मर्यादित षटकांच्या सामन्यात चमक दाखवली असल्याने त्याच्यावरच फिरकीचा संपूर्ण भार राहणार आहे.