सिडनी – सलामीवीर शिखर धवनच्या अर्धशतकी आणि हार्दिक पांड्याच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियावर 6 गडी राखून विजय मिळविला आहे. या विजयासह भारताने तीन टी-20 सामन्याच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. हार्दिक पांडया सामन्याचा मानकरी ठरला.
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या 195 धावाचं आव्हान भारताने 19.4 षटकांत 4 गडी गमावत पूर्ण करत विजय साकारला. भारताकडून शिखर धवनने सर्वाधिक 52 (36) धावा केल्या. त्याने या खेळीत 4 चौकार आणि 2 षटकार लगावले.
हार्दिक पांड्याने अखेरच्या क्षणी तडाखेबाज खेळी करत भारताच्या विजयात महत्वाचा वाटा उचलला. पांड्याने 3 चौकार व 2 षटकरांसह 22 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी छोटेखानी पण महत्वाच्या खेळी केल्या. विराटने 24 चेडूंत 2 चौकार व 2 षटकारांसह 40 तर राहुलने 22 चेंडूत 2 चौकार व 1 षटकरासह 30 धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त संजू सॅमसनने 10 चेडूंत 15 तर श्रेयस अय्यरने 5 चेंडूत नाबाद 12 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून डॅनियल सॅम्स, अँड्रयू टाय, मिचेल स्वीपसन आणि अॅडम झॅम्पा या चौकडीने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
तत्पूर्वी, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी स्विकारताना ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीस पाचारण केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांमध्ये 5 गडी गमावत 194 धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने 32 चेंडूत 10 चौकार व 1 षटकारांसह सर्वाधिक 58 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथने 38 चेंडूत (3 चौकार व 2 षटकार) 46 धावा केल्या. तसेच ग्लेन मॅक्सवेल आणि मोईसेस हेनरिकेसने उपयुक्त खेळी केली. मॅक्सवेल आणि हेनरिकेसने प्रत्येकी 22(13) आणि 26(18) धावांची खेळी केली. मार्कस स्टोइनिसने नाबाद 16 आणि डॅनियल सॅम्सने नाबाद 8 धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत नवोदित गोलंदाज टी नटराजन याने 4 षटकांत 20 धावा देत सर्वाधिक 2 गडी बाद केले. शार्दुल ठाकूर (4 षटकांत 39 धावा) आणि युजवेंद्र चहल (4 षटकांत 51) यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.