अॅडलेड – कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघासमोर यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध आजपासून सुरू होत असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सरस खेळ करण्याचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाला जरी दुखापतींनी ग्रासले असले तरीही त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ होणार असून कोहलीच्या संघाला गतदौऱ्याची पुनरागवृत्ती करण्यासाठी या सामन्यासह मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागणार आहे.
कर्णधार विराट कोहली, मयंक आग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, यष्टीरक्षक वृद्धिमान साहा, रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव, महंमद शमी व जसप्रीत बुमराह असा संघ पहिल्या कसोटीत खेळण्याची शक्यता जास्त आहे.
एकदिवसीय मालिकेत पराभूत झाल्यानंतर भारतीय संघाने टी-20 सामन्यांची मालिका जिंकत पराभवाची परतफेड केली होती. अर्थात दोन भिन्न प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळ व शैलीही भिन्न असल्याने कोहलीच्या संघाला त्यानुरूप खेळात बदल करावा लागणार आहे.
हा सामना दिवस-रात्र पद्धतीने तसेच गुलाबी चेंडूवर खेळला जाणार असल्याने भारतीय संघाला सावध खेळ करावा लागणार आहे. हा सामना भारताचा परदेशातील पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना ठरत आहे. यजमान ऑस्ट्रेलियाने आजवर या पद्धतीच्या सामन्यात एकदाही पराभव स्वीकारलेला नाही. तर भारतीय संघानेही कोलकातामध्ये झालेला पहिला दिवस-रात्र सामना जिंकला असल्याने खेळाडूंना या सामन्यातही आपले वर्चस्व सिद्ध करण्याची नामी संधी चालून आली आहे.
एकदिवसीय मालिकेत यजमान संघाने तर, टी-20 मालिकेत भारतीय संघाने वर्चस्व राखले होते. आता आजपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेत जो संघ बाजी मारेल त्याचे संपूर्ण मालिकेवर वर्चस्व सिद्ध होणार आहे. यजमान संघाची फलंदाजी कर्णधार टीम पेनी, रोरी बर्न्स आणि स्टिव्ह स्मिथ यांच्यावर अवलंबून आहे.
त्यातच स्मिथलाही दुखापतीने ग्रासल्यामुळे भारतीय संघासाठी दिलासादायक वृत्त आहे. तरीही सराव सामन्यातील स्टार ठरलेल्या कॅमेरून ग्रीनच्या कामगिरीवरची भारतीय गोलंदाजांना नियंत्रण ठेवावे लागणार आहे. माजी कर्णधार स्टिव्ह वॉ व रिकी पॉन्टिंग यांचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असल्याने त्याला रोखण्यासाठी भारताला योजना तयार करावी लागणार आहे.
हा सामना खरेतर भारताची भक्कम फलंदाजी व ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी असा रंगणार असला तरीही गेल्या तीन मोसमापासून भारतीय गोलंदाजीनेही जागतिक क्रिकेटवर राखलेले वर्चस्व पाहता यजमान संघासमोरही मोठे आव्हान निर्माण होणार आहे.
या सामन्यानंतर कर्णधार कोहली मायदेशात परतणार आहे. ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्धच्या सराव सामन्यात भारतीय संघातील काही खेळाडूंनी सरस कामगिरी केली. यामुळे संघ व्यवस्थापनासमोर निवडीसाठी पेच निर्माण झाला आहे.
कर्णधार कोहलीसह फलंदाजी भारताकडे आहे. मात्र, सलामीला पृथ्वी शॉ याला अत्यंत जबाबदारीने खेळावे लागणार आहे. गोलंदाजीत जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांच्या गोलंदाजीसमोर यजमान संघाला मोठी धावसंख्या उभारण्याच्या आव्हानाचा सामना करावा लागेल. तसेच अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनची गोलंदाजी त्यांची डोकेदुखी ठरू शकते.
पहिल्या सराव सामन्यात रहाणेने शतकी खेळी केली होती. तर दुसऱ्या डावात पुजाराने अर्धशतक केले होते. दुसऱ्या सराव सामन्यात पंत व हनुमा विहारी यांनी शतकी खेळी केली. त्यामुळे भारतीय संघातील मधळी फळी मजबूत झाली आहे. अर्थात, पंतच्या जागी साहा याला संधी दिली जाणार असल्याने सातव्या क्रमांकापर्यंत आपल्या फलंदाजीला खोली आहे.
ऑस्ट्रेलियाबाबत बोलायचे झाले तर त्यांना संघात दुखापतीचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठा बदल होणार आहे. ऑस्ट्रेलियाने संघात मिचेल स्टार्क व अष्टपैलू मोझेस हेन्रीक्सचा समावेश केला आहे.
बुमराह व शमी लक्षवेधी ठरतील
गेल्या तीन मोसमांपासून भारतीय गोलंदाजीकडे जागतिक क्रिकेटमध्ये आदराने पाहिले जाऊ लागले आहे. जसप्रीत बुमराह व महंमद शमी या जोडगोळीने सातत्याने सरस कामगिरी करत भारतीय संघाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले आहेत. ऑस्ट्रेलियाचा संघ जरी घरच्या मैदानावर खेळत असला तरीही हे दोन गोलंदाज आपल्या स्विंग व यॉर्कर्सवर भल्या भल्या फलंदाजांना नाचवू शकतात त्यामुळे आजपासून सुुरू होत असलेल्या दिवस-रात्र कसोटी सामन्यात याच दोघांची कामगिरी लक्षवेधी ठरणार आहे.
कोहलीला विक्रमाची संधी
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यातील अखेरचा सामना खेळत आहे. यंदाच्या वर्षात त्याला एकही शतक करता आलेले नाही. या कसोटीत त्याने शतकी खेळी केली तर ते त्याचे 42 वे आंतरराष्ट्रीय शतक ठरेल. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकांचा विक्रम कोहलीच्या नावावर जमा होईल. ही कामगिरी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉंन्टिंगच्या नावावर आहे. कोहलीने 188 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व करताना 41 शतके फटकावली आहेत. कर्णधार म्हणून त्याची एकदिवसीय सामन्यात 21 तर, कसोटीत 20 शतके आहेत.
ऍरन फिंचचा संघाला सल्ला
कसोटी मालिकेत जर भारतीय संघाला पराभूत करायचे असेल तर त्यांचा कर्णधार विराट कोहलीसह अन्य फलंदाजांविरुद्ध स्लेजिंग करून आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेऊ नका, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज ऍरन फिंच याने संघाला दिला आहे. कोहली हा जरी त्यांचा प्रमुख फलंदाज असला तरीही त्याला डिवचू नका, त्याला स्लेजिंग केले तर तो ऑस्ट्रेलिया संघासाठी खूप मोठा धोका ठरू शकतो. आजवर त्याला ज्या संघाने स्लेजिंगने त्रस्त करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्याविरुद्ध त्याचा खेळ जास्त आक्रमक झाला आहे, असेही फिंचने म्हटले आहे.