सिडनी – भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या संघातील मार्नस लेबुशेन याच्याकडूनच मोठा धोका होऊ शकतो, असे मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा हा संघ तुल्यबळ आहे. त्यांच्या संघातील लेबुशेन हा खेळाडू भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. दोन वर्षांपूर्वी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळला होता. तेव्हा लाबुशेन संघात नव्हता. गेल्या मोसमापासून लेबुशेनने कसोटी क्रिकेटमध्ये सातत्याने सरस कामगिरी केली आहे. त्यामुळे लाबुशेनकडून भारतीय संघाला सर्वात जास्त धोका आहे, असेही सचिन म्हणाला.
भारतीय संघाने दोन वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात यश मिळवले याचा आजही अभिमान आहे. पण त्यावेळी त्यांच्या संघात लेबुशेन, डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ हे तिन्ही फलंदाज नव्हते. पण या मालिकेत मात्र, ते खेळणार आहेत. त्यामुळे गेल्यावेळच्या ऑस्ट्रेलियाच्या संघाची तुलना केली तर यावेळी त्यांचा सध्याचा संघ जास्तच बलाढ्य वाटत आहे. त्यामुळे या सघाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूला सरस खेळ करावा लागेल, असेही सचिनने सांगितले.