ऍडलेड – रवीचंद्रन अश्विन, उमेश यादव व जसप्रीत बुमराह यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात महत्वपूर्ण आघाडी घेतली. मात्र, गोलंदाजांच्या सरस कामगिरीनंतरही दुसऱ्या डावात भारताला वर्चस्व राखता आले नाही. शुक्रवारी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 1 बाद 9 धावा झाल्या असून आता त्यांच्याकडे 62 धावांची आघाडी आहे. पहिल्या डावाप्रमाणे दुसऱ्या डावातही सलामीवीर पृथ्वी शॉ अपयशी ठरला. त्याआधी भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 191 धावावंर रोखला.
भारताची दुसऱ्या डावातही खराब सुरूवात झाली. पहिल्या डावात भोपळाही न फोडता तंबूत परतलेला सलामीवीर पृथ्वी शॉ याही डावात केवळ 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर मयंक आग्रवालला नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेल्या जसप्रीत बुमराहने चांगली साथ देत दिवसातील उर्वरीत षटके खेळून काढताना संघाचे आणखी नुकसान होऊ दिले नाही. खेळ थांबला तेव्हा भारताच्या 1 बाद 9 धावा झाल्या असून आता त्यांच्याकडे 62 धावांची आघाडी आहे. या सामन्याचे अद्याप तीन दिवस बाकी असून वर्चस्व राखण्याची नामी संधी भारतीय संघाला मिळाली आहे.
कालच्या धावसंख्येत केवळ 11 धावांची भर घालून भारताचा पहिला डावा 244 धावांवर संपूष्टात आला. त्यानंतर मॅथ्यू वेडच्या साथीत जो बर्न्सने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाची सुरूवात केली. या जोडीने खाते उघडण्यासाठी तब्बल 28 चेंडू खेळले. डावातील 15 व्या षटकात जसप्रीत बुमराहने मॅथ्यू वेडला बाद करत संघाला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर 17 व्या षटकात बुमराहने जो बर्न्सला बाद करत यजमानांना आणकी एक धक्का दिला त्यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था 2 बाद 29 अशी झाली होती.
यंदाच्या मोसमात भरात असलेला त्यांचा प्रमुख फलंदाज स्टीव्ह स्मिथ देखील अपयशी ठरला. त्याला अश्विनने चकवले. अश्विनने त्या पाठोपाठ ट्रेव्हिस हेड व कॅमेरुन ग्रीन यांनाही बाद करत यजमानांची गत 5 बाद 79 अशी बिकट केली. यावेळी खेळपट्टीवर स्तिरावू पाहात असलेल्या मार्सन लेबुशेनलाही बाद करण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्याचा सोपा झेल पृथ्वी शॉने सोडला. महंमद शमी अपयशी ठरल्यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने चेंडू उमेश यादवकडे सोपवला व चमत्कार घडला. त्याने स्थिरावलेल्या लेबूशेनचा अडसर दूर केला. लेबूशेनने 47 धावा केल्या. याच षटकांत त्याने पॅट कमिन्सलाही तंबूत पाठवले. यावेळी ऑस्ट्रेलियाची अवस्था 7 बाद 111 अशी बनली.
त्यानंतर आलेल्या मिशेल स्टार्कने कर्णधार टीम पेनला सुरेख साथ देताना संघाचा डावसावरला. मात्र, चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्टार्क धावबाद झाला. दरम्यान पेनने अर्धशतक पूर्ण केले. अश्विनने नाथन लायनला 10 धावांवर बाद करत ऑस्ट्रेलियाचा नववा गडी बाद केला. त्यानंतरही बराच काळ पेनने जोश हेझलवूडच्या साथीत षटके खेळून काढली. अखेर उमेश यादवनेच हेजलवुडला बाद करत यजमानांचा डाव 191 धावांवर संपवला. भारताकडून अश्विनने 4, उमेश यादवने 3 तर, जसप्रीत बुमराहने दोन गडी बाद केले. पेन 73 धावांवर नाबाद राहिला.
तत्पूर्वी, गुरूवारच्या 6 बाद 233 धावांवरून पुढे खेळ सुरू झाल्यावर केवळ 11 धावांची भर घालून भारताचा पहिला डाव शुक्रवारी पहिल्याच सत्रात 244 धावांवर संपूष्टात आला. गुरूवारी कर्णधार विराट कोहलीच्या झुंझार 74 धावांची खेळी व त्याने चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांच्यासह केलेल्या महत्वपुर्ण भागादारीमुळे 6 गडी बाद 233 धावांपर्यंत मजल मारली होती.
सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताच्या तळातील फलंदाजांना मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स गुंडाळले व भारताचा पहिला डाव 244 धावांवर संपूष्टात आणला. भारताचे अखेरचे चार फलंदाज केवळ 11 धावांची भर घालून बाद झाले. दुसऱ्या दिवशी खेळ सुरु झाल्यावर लगेचच कमिन्सने रविचंद्रन आश्विनला बाद केले. त्यानंतर ठराविक अंतराने भारताचे फलंदाज बाद झाले. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने 4, पॅट कमिन्सने 3 तर हेजलवूड आणि लॉयन यांनी 1-1 बळी घेतला.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 93.1 षटकांत सर्वबाद 244 धावा. (विराट कोहली 74, चेतेश्वर पुजारा 43, अजिंक्य रहाणे 42, मयंक आग्रवाल 17, हनुमा विहारी 16, रवीचंद्रन अश्विन 15, वृद्धिमान साहा 9, मिशेल स्टार्क 4-53, पॅट कमिन्स 3-48, जोश हेझलवूड 1-47, नाथन लायन 1-68). ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 72.1 षटकांत सर्वबाद 191 धावा. (टीम पेनी नाबाद 73, मार्नस लेबूशेन 47, मिशेल स्टार्क 15, नाथन लायन 10, रवीचंद्रन अश्विन 4-75, उमेश यादव 3-40, जसप्रीत बुमराह 2-52). भारत दुसरा डाव – 6 षटकांत 1 बाद 9 धावा. (पृथ्वी शॉ 4, मयंक आग्रवाल खेळत आहे 4, जसप्रीत बुमराह खेळत आहे 0, पॅट कमिन्स 1-6).