-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर दाखल झालेल्या भारतीय संघाला एकदिवसीय सामन्यांची मालिका गमवावी लागली असली तरीही आता आजपासून सुरू होत असलेल्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयाची संधी निर्माण करायची असेल तर एखाद दोन खेळाडूंवरच अवलंबून राहण्यापेक्षा सांघिक खेळाची गरज जास्त आहे.
क्रिकेटचा खेळ वैयक्तिक कामगिरीवर खेळला जाणारा नसतो तर सांघिक कामगिरीमुळेच यशापयशाची टक्केवारी स्पष्ट होत असते. तसेच भारताबाबत पाहायला गेले तर व्यक्तिमहात्म्य असलेला हा देश असून त्यातून क्रीडा क्षेत्रही अलग राहिलेले नाही. पूर्वी सुनील गावसकर नंतर सचिन तेंडुलकर व आता विराट कोहली यांच्यावरच संघाची खरी मदार राहिली आहे. हे महान खेळाडू कसे खेळतात यावरच संघाचा विजय व पराभव ठरतो. मात्र, गेल्या दोन मोसमांपासून कोहलीच्या खांद्यावरचे हे ओझे काही प्रमाणात रोहित शर्माने तर, काही प्रमाणात लोकेश राहुलने कमी केले आहे. या मालिकेत रोहितचा संघात समावेश नसल्याने कोहलीच्या बरोबरीने राहुलच्याही कामगिरीकडे लक्ष राहणार आहे.
आयपीएल स्पर्धेत राहुलने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती त्यामुळे क्रिकेटच्या या अधिक वेगवान प्रकारात त्याची कामगिरी भरीव झाली तर विजयाच्या आशा वाढणार आहेत; परंतु यंदाच्या आयपीएल स्पर्धेत मयंक आग्रवाल, श्रेयस अय्यर, हार्दिक पंड्या, मनीष पांडे व रवींद्र जडेजा अशी तगडी फलंदाजी संघाकडे आहे. त्यातही कर्णधार कोहलीच्या बरोबरीने या खेळाडूंनी आपला दर्जा सिद्ध केला आहे. अखेरच्या एकदिवसीय सामन्यातही पंड्या व जडेजा यांनीच भारताच्या डावाला आकार दिला होता त्यामुळे या मालिकेतही त्यांच्याकडून अशाच दर्जेदार खेळाची अपेक्षा आहे.
यजमान संघाला स्थानिक वातावरणाचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात असले तरीही टी-20 क्रिकेटच्या सामन्यात एखादे षटक महागडेही ठरू शकते किंवा नुकसानकारकही ठरू शकते. एखाद्या खेळाडूच्या आक्रमक फलंदाजीमुळे संपूर्ण सामन्याचेही चित्र पालटू शकते. मात्र, तरीही वैयक्तिक कामगिरीपेक्षाही सांघिक खेळाच्या जोरावरच सामने जिंकणे सुलभ होते.
भारतीय संघाने अखेरच्या एकदिवसीय सान्यात मिळवलेला विजय या मालिकेसाठी भारतीय संघाच्या आत्मविश्वासात भर टाकणारा ठरेल यात शंका नाही. यजमान ऑस्ट्रेलियाची फलंदाजी जितकी तगडी दिसते तो दर्जा त्यांच्या गोलंदाजीत दिसत नाही. त्यांचे जितके गोलंदाज आयपीएल स्पर्धेत खेळले त्यांच्या कामगिरीत सातत्य नव्हते व हीच गोष्ट भारतीय संघाच्या पथ्यावर पडणार आहे. अमिरातीत आयपीएल स्पर्धेत सराव मिळाल्यामुळे भारतीय संघाने सांघिक खेळ करण्यावर भर दिला तर सातव्या क्रमांकापर्यंत असलेल्या फलंदाजीवर अंकुश राखणे यजमान संघासमोरचे सर्वात कठीण आव्हान ठरेल.
भारतीय गोलंदाजी जरी एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन्ही सामन्यांत अपयशी ठरली असली तरीही प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला अखेरच्या सामन्यात लय सापडल्यामुळे कोहलीला दिलासा मिळाला आहे. त्यातच नवेदित मात्र, सातत्याने यॉर्कर्स टाकण्याची क्षमता असलेला टी. नटराजन, स्विंगची क्षमता असलेला दीपक चहर व नवदीप सैनी आणि त्यांच्या जोडीला अनुभवी महंमद शमी यांचीच गोलंदाजी यजमान संघापेक्षा वरचढ ठरेल अशी अपेक्षा आहे.
ऑस्ट्रेलियाला रोखायचे असेल तर त्यांचा कर्णधार ऍरन फिंच, स्टिव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल यांना लवकर बाद करावे लागेल. त्यांचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे या मालिकेत खेळणार नसल्याने त्यांना मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणे वाटते तितके सोपे ठरणार नाही, भारतीय संघाने याच त्यांच्या कमकुवत दुव्यांचा फायदा उचलला तर ही मालिका जिंकणे कठीण नाही.