ब्रिस्बेन :- ऑस्ट्रेलिया-भारत यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अखेरच्या आणि निर्णायक सामन्यात रंगत वाढली आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत दुसऱ्या दिवशी भारताच्या प्रमुख फलंदाजांना बाद करत सामन्यावर पकड निर्माण केली होती. मात्र, तिसऱ्या दिवशी शार्दुल ठाकूर आणि सुंदर वॉशिंग्टन यांनी केलेल्या निर्णायक अर्धशतकाच्या मदतीने भारताने कमबॅक केले आहे. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 336 धावा केल्या. दिवसाअखेर आस्ट्रेलियाने एकही गडी न गमविता 21 धावा करत 54 धावांची आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात केलेल्या 369 धावांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देताना भारताच्या आघाडीच्या फलंदाजांनी पुन्हा निराशा केली. सलामीवीर शुभमन गिल अवघ्या 7 धावांवर माघारी परतला. रोहित शर्मा (44), चेतेश्वर पुजारा (25), अजिंक्य रहाणे (37), मयंक अग्रवाल (38) आणि ऋषभ पंत (23) हे फलंदाजही खेळपट्टीवर सेट झाल्यानंतर बाद झाले. भरवशाचे फलंदाज झटपट माघारी परतल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दमदार खेळी करत विक्रम रचला.
ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर या जोडीने यशस्वी झुंज दिली. अनुभवी फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर या नवख्या जोडीने शांत आणि संयमी फलंदाजी केली. दोघांनीही आपल्या फलंदाजीची प्रतिभा दाखवून दिली. तळाच्या फळीतील फलंदाजांप्रमाणे बॅट फिरवण्यात धन्यता न मानता त्यांनी तंत्रशुद्ध खेळ केला. दोघांनीही आपले पहिले कसोटी अर्धशतक झळकावले. शार्दुल ठाकूरने षटकार लगावत अर्धशतक पूर्ण केले, तर वॉशिंग्टन सुंदरने त्यानंतरच्या षटकात अर्धशतक झळकावले. शार्दुलने 115 चेंडुत 9 चौकार आणि 2 षटकार खेचत 67 धावांची खेळी केली. त्याला कमिन्सने त्रिफळाचित केले. या दोघांनी शतकी भागीदारी केली. ब्रिस्बेनच्या मैदानावर सातव्या विकेटसाठी ही भारताची सर्वात मोठी भागीदारी ठरली.
ऑस्ट्रेलियाकडून जोश हेजलहुड याने 57 धावा देत भारताचा अर्धा संघ गारद केला. तर मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट घेत चांगली साथ दिली.
पदार्पणात अष्टपैलू कामगिरी….
भारताचा युवा खेळाडू वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अष्टपैलू कामगिरी करत यशस्वीपणे पर्दापण केले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाचा डाव 369 धावांवर गुंडाळण्यात सुंदरने मोलाचा वाटा दिला होता. त्याने 89 षटके गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख तीन फलंदाजांना माघारी धाडले होते. यत अनुभवी फलंदाज स्टिव्ह स्मिथ हा त्याचा पहिला शिकार ठरला. यानंतर त्याने कॅमरॉन ग्रीन आणि नॅथन लियॉन यांना त्रिफळाचीत भारताला यश मिळवून दिले. त्यानंतर भारताकडून पहिल्या डावात योग्य वेळी फलंदाजी करताना 144 चेंडूत 62 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 1 षटकार आणि 7 चौकार खेचला. याबरोबरच त्याने शार्दुल ठाकूरसह 7व्या विकेटसाठी 123 धावांची विक्रमी भागीदारी केली.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 115.2 षटकात सर्वबाद 369 (मार्नस लेबुशेन 108, मॅथ्यू वेड 45, स्टिव्ह स्मिथ 36, टीम पेनी 50, कॅमेरुन ग्रीन 47. टी. नटराजन 78-3, शार्दुल ठाकूर 94-3, वॉशिंग्टन सुंदर 89-3)
भारत पहिला डाव – 111.4 षटकात सर्वबाद 336 (रोहित शर्मा 44, शुभमन गिल 7, चेतेश्वर पुजारा 25, अजिंक्य रहाणे 37, ऋषभ पंत 23, वॉशिंग्टन सुंदर 62, शार्दुल ठाकूर 67, महंमद सिराज 13. जोश हेजलहुड 57-5, पॅट कमिन्स 94-1, नाथन लियॉन 65-1)
ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 6 षटकात 21(मार्कस हॅरिस नाबाद 1, डेव्हिड वॉर्नर नाबाद 20. टी. नटराजन 6-0. महंमद सिराज 12-0)