मुंबई – करोनाचा धोका कमी झाल्यामुळे ऑस्ट्रेलियातील परिस्थिती सुधारत असून आयसीसीच्या पुढील बैठकीत त्यांचे पंतप्रधान जर टी-20 विश्वकरंडक खेळवण्यासाठी तयार झाले तर त्याचा थेट फटका बीसीसीआयला बसणार असून आयपीएल स्पर्धेसाठी त्यांचा निर्णय घातक ठरेल, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
करोनामुळे ऑस्ट्रेलिया सरकारने देशात सहा महिन्यांचा लॉकडाऊन केला होता. त्याची मुदत येत्या 30 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. तसेच त्यापूर्वीच सरकारने काही सवलती दिल्या असून आयसीसीच्या जुलैमध्ये होत असलेल्या बैठकीत त्यांनी ठरलेल्या वेळापत्रकानुसार टी-20 विश्वकरंडक स्पर्धा आयोजित करण्याची तयारी दर्शवली तर आयपीएल खेळविण्याच्या बीसीसीआयच्या स्वप्नांना मूठमाती द्यावी लागणार आहे.
यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करावी लागली तर बीसीसीआयला जवळपास 5 हजार कोटींचा फटका बसणार आहे. सध्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धा रद्द होऊ शकते, असे मानून बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा खेळविण्यासाठी कंबर कसली आहे. एकवेळ रिकामे मैदान ठेवून, करोनाबाबतची सर्व काळजी घेत ही स्पर्धा खेळविण्यासाठी सध्या बीसीसीआय युद्धपातळीवर खटपट करत आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया सरकारचा एक निर्णय हे स्वप्न भंग करू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
प्रेक्षकांनाही प्रवेश मिळणार…
ऑस्ट्रेलियातील मैदानांची प्रेक्षकक्षमता मोठी आहे. मेलबर्न, सिडनी येथे 80 हजारपेक्षाही जास्त प्रेक्षक उपस्थित राहू शकतात. करोनाचा धोका कमी होत असून टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी प्रेक्षक क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांना सामना पाहण्यासाठी मैदानात उपस्थित राहण्याची परवानगीही मिळू शकते, असे संकेत ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाने सरकारच्या हवाल्याने दिले असल्याने आयपीएल पुन्हा एकदा संकटात सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.