-अमित डोंगरे
ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी जसप्रीत बुमराह, उमेश यादव या वेगवान तर, रवीचंद्रन अश्विन या फिरकी गोलंदाजासमोर चक्क नांगी टाकली होती. मात्र, ज्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियन गोलंदाज चेंडू सातत्याने स्विंग करत होते, त्याच खेळपट्टीवर महंमद शमी सारखा स्विंग गोलंदाज अपयशी कसा ठरतो हाच प्रश्न निर्माण झाला आहे.
एकीकडे अश्विनसह बुमराह व यादवने यजमान संघाच्या फलंदाजीची वाताहत केली तर दुसरीकडे पुन्हा एकदा तळातील फलंदाजांनी भारताची डोकेदुखी वाढवली. हे पहिल्यांदाच नव्हे तर सातत्याने आपल्याच विरूद्ध प्रत्येक संघाकडून घडत आहे. पहिले पाच फलंदाज स्वस्तात बाद झाले तरीही ऑस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांनी याच गोलंदाजीवर आक्रमण करत धावा केल्या. भारतीय संघाला या डावात किमान शंभर धावांची आघाडी मिळेल असे वाटत असतानाच त्यांचे शेपूट पुन्हा एकदा वळवळले.
शमी खरेतर यंदा सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. मात्र, या डावात त्याला एकदाही चेंडू स्विंग करता आला नाही. त्याचे इनस्विंगर, आऊट स्विंगर तसेच ऑफकटर्स या सामन्यात गायब झाले. त्याचे तीनही स्पेल अपयशी ठरल्यानंतरही कर्णधार विराट कोहलीने त्याला चेंडू जुना झाल्यावर पुन्हा गोलंदाजी दिली. या डावात शमीला एकही गडी बाद करता आला नाही. जो रिव्हर्सस्विंग उमेश यादव करत होता त्यातही शमी कमी पडला.
हे असे वारंवार पाहण्यात आले आहे की प्रतिस्पर्धी संघ कोणताही असो पहिले पाच फलंदाज बाद झाल्यावरआपण ढेपाळतो वतळातील फलंदाज आपल्या तोंडातील घास काढून घेतात. हे असे आणकी कीती काळ सुरू राहणार. याच बाबतीत सुधारणा होण्यासाठी प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार कोहली व सपोर्ट स्टाफ आणि गोलंदाजी प्रशिक्षक काही उपाययोजना करणारा का या मालिकेतील प्रत्येक सामन्यात पुन्हा ये रे माझ्या मागल्या हेच चित्र दिसणार.
गेल्या तीन मोसमांपासून सातत्याने सरस गोलंदाजी करत असलेले भारतीय गोलंदाज पहिल्या पाच बळींनंतर का सुस्तावतात. गोलंदाजी सरस झाली तर क्षेत्ररक्षण गचाळ होते. त्यांचे सलामीवीर मॅथ्यू वेड व जो बर्न्स लवकर सापडले इतकेच नव्हे तर त्यांचा सर्वात अव्वल फलंदाज स्टिव्ह स्मिथही लगेच परतला. मात्र, फलंदाजीत अपयशी ठरलेल्या पृथ्वी शॉने मार्नस लेबुशेनचा सोपा झेल सोडला आणि नेमका तोच खेळपट्टीवर टीकून राहिला. शॉ याच्यावर कोहली संतापला होता पण त्यानेच त्याला संघात स्थान दिल्यामुळे आपलेच दात आणि आपलेच ओठ, मग बोलणार कोण. कॅचेस विन मॅचेस हे सुत्र असते, मात्र भारतीय क्षेत्ररक्षकांनी या डावात केलेल्या काही चूका महागड्या ठरु नयेत म्हणजे झाले.
लेबूशेनने चांगली खेळी केली, त्यावेळी उमेश यादवच्या सुरेख इनस्विंगरवर तो चकला व पायचीत झाला. त्यानंतरही आपल्याला सामन्यावर पकड मिळवता आली नाही. ट्रेवस हेड, कॅमेरून ग्रीन व पॅट कमिन्स लवकर सापडल्यानंतरही टीम पेनीने कर्णधाराची जबाबदारी पार पाडताना संघाला 191 धावांच्या जवळ पोहोचवताना भारताचे मोठी आघाडी घेण्याचे मनसुबे उधळून लावले. त्यालाही केवळ 13 धावांवर धावबाद करण्याची संधी सोडली व त्याने दमदार खेळी करत या सामन्यावर भारतीय संघ वर्चस्व राखणार नाही याची काळजी घेतली.
तो भक्कमपणे फलंदाजी करताना पाहून मिशेल स्टार्क व नाथन लायन यांचाही आत्मविश्वास वाढला व त्यांच्यासह पेनीने छोट्या का होईना पण अत्यावश्यक भागीदारी करत संघाचा डाव सावरला. आता दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांनी जबाबदारीने फलंदाजी केली तरच या सामन्यात विजयाची संधी मिळेले अन्यथा अपयश ठरलेलेच आहे.