मेलबॉर्न – कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाने भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या भारतात राहिलेल्या नागरिकांनाही ते परत घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे तेथे मोठेच वादंग निर्माण झाले आहे. पण या निर्णयावर पंतप्रधान स्कॉट मॉरीस ठाम आहेत.
त्यांनी म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियातील तिसरी संभाव्य लाट रोखण्यास या निर्णयामुळे मदतच होणार आहे. आपल्या या निर्णयाचे चांगले परिणामही दिसून येऊ लागले असून कोविड क्वारंटाइन सेंटरमधील रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
ज्या ऑस्ट्रेलियन नागरिकांनी भारतात चौदा दिवस किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी घालवला आहे त्यांना ऑस्ट्रेलियास परतण्यासही सध्या बंदी आहे. ऑस्ट्रेलियाच्या सरकारने स्वतःच्याच देशातील नागरिकांना मायदेशी परतण्यास बंदी घालण्याचा त्या देशाच्या इतिहासातील हा पहिलाच प्रसंग आहे.
तरीही हा बंदी आदेश झुगारून कोणी ऑस्ट्रेलियात परत आल्यास त्याला पाच वर्षांच्या कारावासाची किंवा 66 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर्सच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. आपल्या सरकारचा हा निर्णय योग्यच असून त्याचा देशाला व देशाच्या नागरीकांना लाभच होईल असे पंतप्रधान मॉरीस यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.