– भारताची वर्ष 1931 पासूनची सर्वात निचांकी धावसंख्या
– अडीच दिवसांत कसोटीचा खेळ खल्लास
– हेझलवुडच्या “जोश’पुढे भारताचा पालापाचोळा
– एकाही भारतीयाची दुहेरी धावसंख्या नाही
ऍडिलेड – कोणत्याही गोलंदाजाने पाच विकेटसच्या कामगिरीसाठी आजवर इतक्या कमी धावा दिल्या नसतील, जितक्या ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवुडने दिल्या. पाच षटकांत तीन निर्धाव षटके टाकत अवघ्या आठ धावांत पाच विकेट्स घेणारा जोश हेझलवुड आणि 10.2 षटकांत अवघ्या 21 धावांत 4 विकेट्स घेणारा पॅट कमिन्स यांच्या माऱ्यापुढे शब्दश: लोटांगण घालत “कागदी वाघ’ विराट सेनेने आजवरची निचांकी धावसंख्या गाठत, दुसऱ्या दिवशी पकड मिळालेला संपूर्ण सामना काही तासांत आपल्या हातातून गमावला.
ही कहाणी आहे, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्याची. साधारण 46 वर्षांपूर्वी भारताने सर्वबाद 42 अशी निचांकी कामगिरी केली होती. कोहलीच्या सवंगड्यांनी सर्वबाद 36 धावा करुन, आपल्या सर्व मर्यादा उघड केल्याचे दिसून आले. पहिल्या डावात भारताने सर्वबाद 244 धावा केल्या होत्या.
त्याचबरोबर भारतीय गोलंदाजांनी चमक दाखवत भारताला 63 धावांची आघाडी मिळवून देताना, यजमान ऑस्ट्रेलियाला 191 धावांत रोखले होते. काल 1 बाद 9 धावांवरुन पुढे खेळताना, भारताचे मनसुबे असे होते की, किमान 350 धावांची आघाडी घ्यायची आणि ऑस्ट्रेलियाला चौथ्या-पाचव्या दिवशी फिरकीच्या जाळ्यांत फसवायचे. आणि पहिली कसोटी आरामात खिशात टाकायची.
मात्र, भारताची ही स्वप्ने शनिवारी अवघ्या तीन तासांत धुळीला मिळाली. मयंक आगरवाल आणि नाईट वॉचमन अर्थात रात्रीचा रखवालदार म्हणून आलेल्या जसप्रित बुमराहने आजच्या खेळाची सुरुवात केली, त्यावेळी हेझलवुड-कमिन्सचे कोणते वादळ “जोश’ात येणार आणि भारताला भुईस”पॅट’ करणार याची कोणालाही खबर नव्हती.
आपण सलामीसाठी उपयुक्त नसल्याची खात्री पृथ्वी शॉने (4 धावा) शुक्रवारीच पटवली होती. आता आपण भारतीय संघाच्या कोणत्याचा क्रमांकाच्या फलंदाजीसाठी उपयुक्त नसल्याची खात्री पटवण्याची बारी इतरांची होती.
मग सर्वप्रथम बुमराह (2 धावा), त्यानंतर पुजारा (0 धावा), मयंक अगरवाल (सर्वाधिक 9 धावा) मग खुद्द कर्णधार कोहली (4 धावा), उपकर्णधार अजिंक्य रहाणे (0 धावा), त्यानंतर हनुमा विहारी (8 धावा), यष्टीरक्षक वृद्धीमान सहा (4 धावा), रविचंद्रन आश्वीन (0 धावा) तसेच उमेश यादव (नाबाद 4 धावा) तर मोहम्मद शामी नाबाद 1 अशी भारताची भयावह स्थिती राहिली. शामीच्या हाताला कमिन्सचा चेंडू लागल्याने तो डावात फलंदाजी करु न शकल्याने त्याला जखमी निवृत्त व्हावे लागले.
भारताला सर्वाधिक त्रास दिला तो हेझलवुडच्या उसळत्या चेंडूंनी. त्याने अगरवाल, रहाणे, विहारी, सहा आणि आश्विनला जाळ्यात पकडले. तर कमिन्सने शॉ, बुमराह, पुजारा आणि कोहलीची शिकार केली.
जिंकण्यासाठी आवश्यक 90 धावांसाठी ऑस्ट्रेलियाने 21 षटके घेतली. त्यात मॅथु वेडच्या 33 आणि ज्यो बर्न्सच्या नाबाद 51 धावांचा मुख्य समावेश होता. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी केलेली 70 धावांची भागिदारीच निर्णायक ठरली. बर्न्स आणि स्मिथने विजयाची औपचारिकता पूर्ण केली. मॅथ्यु वेड धावबाद झाला तर लेबुशेनला आश्विनने बाद केले.
धावफलक – भारत पहिला डाव सर्वबाद 244; दुसरा डाव – 9 बाद 36 – पृथ्वी शॉ त्रिफळा कमिन्स 4; मयंक अग्रवाल झेल टीम पेन गो. हेजलवुड 9; जसप्रीत बुमराह झे. व गो. पॅट कमिन्स 2; चेतेश्वर पुजारा झे. टीम पेन गो. पॅट कमिन्स 0; विराट कोहली झे. ग्रीन गो. पॅट कमिन्स 4; अजिंक्य रहाणे झे. टीम पेन गो. जोश हेझलवुड 0; हनुमा विहारी झे. टीम पेन गो. जोश हेझलवुड 8; वृद्धिमान साहा झे. लाबुशेन गो. जोश हेझलवुड 4; रविचंद्रन आश्विन झे. टीम पेन गो. जोश हेझलवुड 0; उमेश यादव नाबाद 4; मोहम्मद शमी (जखमी निवृत्त) 1 एकूण 21.2 षटकांत 9 बाद 36 – गोलंदाजी – मिशेल स्टार्क 6-3-7-0; पॅट कमिन्स 10.2-4-21-4; जोश हेझलवुड 5-3-8-5
ऑस्ट्रेलिया – पहिला डाव – सर्वबाद 191 – दुसरा डाव – 2 बाद 93 – मॅथ्यु वेड धावबाद 33; ज्यो बर्न्स नाबाद 51, मार्नस लेबुशेन झे. मयंक आगरवाल गो. आर. आश्वीन, स्टीव्हन स्मिथ नाबाद 1 अवांतर 2 एकूण – 21 षटकांत 2 बाद 93. गोलंदाजी – उमेश यादव – 8-1-49-0; जसप्रित बुमराह 7-127-0; रविचंद्रन आश्वीन 6-1-16-1