दुबई – यंदा भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघामध्ये टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार असून ऑस्ट्रेलिया भारताला मात देऊन जेतेपद पटकावेल, असे भाकित ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू रिकी पॉटिंगने केले आहे.
रिकी पॉटिंग म्हणाले, ऑस्ट्रेलियातच सामने होणार असल्याने ऑस्ट्रेलियाला याचा निश्चितच फायदा होईल. ज्यामुळे सध्या विश्वचषक विजेता असलेला ऑस्ट्रेलियाचा संघच ट्रॉफी कायम ठेवेल. यूएईमध्ये झालेल्या विश्वचषकात खेळपट्टी ऑस्ट्रेलिया संघासाठी अधिक परिचित नव्हती. तरी ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता, असे त्याने सांगितले.
तसेच ऑस्ट्रेलिया आणि भारताशिवाय यंदा टी-20 विश्वचषकात इंग्लंडचा संघ एक मोठं आव्हान असणार आहे. सध्या इंग्लंडचा संघ व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये अप्रतिम फॉर्मात आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघही विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकतो. त्यामुळे भारत, ऑस्ट्रेलिया किंवा इंग्लंड हे संघच विजेतेपदाचे दावेदार असल्याचे पॉटिंगने म्हटले आहे.
दरम्यान, आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियात येत्या दि. 16 ऑक्टोबर ते दि. 13 नोव्हेंबरपर्यंत पार पडणार आहे.