सिडनी – चेतेश्वर पुजारा, ऋषभ पंत, रवीचंद्रन अश्विन व हनुमा विहारी यांनी खेळपट्टीवर रॉक ऑफ जिब्राल्टरप्रमाणे भक्कम उभे राहत यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना अखेर अनिर्णित राखण्यात यश मिळवले. चौथ्या डावात शंभरपेक्षा जास्त षटके खेळून काढताना त्यांनी दाखवलेली विजिगिषू वृत्ती या सामन्यात कौतुकाची बाब ठरली.
दुखापत झाल्यानंतरही विहारीने केलेली संयमी फलंदाजी व त्याला रवीचंद्रन अश्विनने दिलेली साथ हेच या सामन्याचे सर्वात मोठे वैशिष्ठ्य ठरले. खेळपट्टीवर नांगर टाकत विहारी व अश्विन यांनी थोडेथोडके नव्हे तर तब्बल 259 चेंडू खेळून काढत तिसरी कसोटी अनिर्णित राखली व भारतीय संघाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत झालेली 1-1 अशी बरोबरी कायम राखली. आता येत्या 15 जानेवारीपासून या मालिकेतील अखेरचा चौथा कसोटी सामना होणार आहे.
विहारी व अश्विन जोडीने ऑस्ट्रेलियाच्या अत्यंत भेदक गोलंदाजीसमोर कोणताही धोका न पत्करता फलंदाजी केली. एकवेळ विहारी तर 100 चेंडूत केवळ 6 धावांवर खेळत होता. मिशेल स्टार्क, पॅट कमिन्स व जोश हेजलवूड यांच्या उसळत्या चेंडूंवर दोघांनाही दुखापत झाली होती. मात्र, तरीही त्यांनी नेटाने किल्ला लढवला. या स्थितीतही दोघांनी संयमी फलंदाजी करत सामना वाचवला. विहारी व अश्विन यांनी सहाव्या गड्यासाठी 259 चेंडूत 62 धावांची भागिदारी केली. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 407 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने पाच गडी गमावून 334 धावापर्यंत मजल मारली होती. त्यावेळी सामना अनिर्णित अवस्थेत संपला.
सोमवारी सामन्याच्या पाचव्या दिवशी फलंदाजी करताना विहारीने 161 चेंडूचा सामना करताना 23 धावा केल्या. त्यामानाने अश्विनने 128 चेंडूचा सामना करत 39 धावा केल्या. या दोघांनी अखेरपर्यंत नाबाद राहताना भारतीय संघाला पराभवाच्या गर्तेतून बाहेर काढले. वर्णद्वेषी टीकेला आपल्या खेळाने उत्तर देण्याच्या त्यांच्या या वृत्तीचे तुफान कौतुक सुरु झाले आहे. एकवेळ भारतीय संघ सामना गमावेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, या जोडीने संयमी फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाचे सामना जिंकण्याचे मनसुबे उधळून लावले. ही जोडी फोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाने सातत्याने स्लेजिंगही केले. मात्र, त्यांनी याकडे लक्ष न देता आपला तोल ढळू दिला नाही.
भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने सामन्याच्या पाचव्या दिवशी पुजाराच्या साथीने पुढे खेळ सुरु केला. मात्र, रहाणे लगेचच बाद होऊन परतला. त्यानंतर पंतने आश्वासक फलंदाजी करताना आपल्या दुखापतीवरही मात करत सर्व संघाचे मनोबल वाढवले. त्याचे शतक मात्र पूर्ण होऊ शकले नाही. त्याने 12 चौकार व 3 षटकार फटकावताना 118 चेंडूत 97 धावा केल्या. नाथन लॉयनच्या गोलंदाजीवर तो बाद झाला.
त्यानंतर लगेचच पुजाराही तब्बल 205 चेंडूत 77 धावा करुन बाद झाला. त्यावेळी हा सामना भारतीय संघ गमावणार अशीच स्थिती निर्माण झाली होती. मात्र, विहारी व अश्विन यांनी खंबीर व जिद्दीने सामना वाचवला. रवींद्र जडेजालाही दुखापत झाल्याने तो फलंदाजी करु शकेल का नाही असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यातच विहारीलाही स्नायू ताणले गेल्याने धावा काढणेही कठीण जात होते. तरीही त्यांनी पराभव टाळला. विहारीने नाबाद 23 तर, अश्विनने नाबाद 39 धावांची खेळी केली.
संक्षिप्त धावफलक –
ऑस्ट्रेलिया पहिला डाव – 338. भारत पहिला डाव – 244. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 87 षटकांत 6 बाद 312 घोषित. भारत दुसरा डाव – 131 षटकांत 5 बाद 334 धावा. (रोहित शर्मा 52, शुभमन गील 31, चेतेश्वर पुजारा 77, ऋषभ पंत 97, रवीचंद्रन अश्विन नाबाद 39, हनुमा विहारी नाबाद 23, जोश हेजलवूड 2-39, नाथन लॉयन 2-114, पॅट कमिन्स 1-72).