सिडनी – वेगवान गोलंदाज महंमद शमी वगळता अन्य गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाचा यजमान ऑस्ट्रेलियाच्या अ संघाविरुद्धचा दुसरा सराव सामना जिंकण्यात अपयश आले. यजमानांकडून जॅक वाईल्डरमाऊथ व बेन मॅक्डरमॉट याने शतकी खेळी करत पराभव टाळला.
4 बाद 386 धावांवर भारताने आपला दुसरा डाव घोषित केला व ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 473 धावा करण्याचे कठीण आव्हान उभे केले. यजमानांचा दुसरा डाव सुरु झाल्यावर 1 बाद 6, 2 बाद 12 व 3 बाद 25 अशी दयनिय स्थिती बनली होती. त्यावेळी वेगवान गोलंदाज महंमद शमीने पहिल्या डावाप्रमाणे याही डावात भेदक गोलंदाजी केली. त्याला साथ देताना महंमद सिराजनेही एक बळी घेतला. मात्र, त्यावेळी भारतीय संघाने दडपण राखले असते तर त्यांना सामना जिंकण्याची नामी संधी होती. मात्र, जसप्रीत बुमराह व नवदीप सैनी यांना एकही गडी बाद करता आला नाही.
The three-day pink-ball game between Australia A and India ends in a draw.
India 194 and 386/4d
Australia 108 and 307/4📸📸 Courtesy: Getty Images Australia pic.twitter.com/vMZhk2WNuc
— BCCI (@BCCI) December 13, 2020
बदली गोलंदाज म्हणून गोलंदाजी करणाऱ्या हनुमा विहारीने अलेक्स कॅरीला बाद केले. त्यानंतर मात्र, मॅक्डरमॉटने डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने दमदार शतकी खेळी करताना भारताच्या हातून सामना काढून घेतला. त्याने प्रथम कॅरीसह चौथ्या गड्यासाठी 117 धावांची भागीदारी केली. कॅरी बाद झाल्यावर आलेल्या जॅक वाइल्डरमाऊथनेही शतकी खेळी करत मॅक्डरमॉटला सुरेख साथ दिली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी दीडशतकी भागीदारी करत संघाचा पराभव टाळला.
मॅक्डरमॉटने आपल्या शतकी खेळीत 16 चौकार फटकावताना नाबाद 107 धावा केल्या. तर, वाईल्डरमाऊथने नाबाद 111 धावांची खेळी करताना 119 चेंडूत 12 चौकार व 3 षटकार आशी आक्रमक फटकेबाजी केली.
भारतीय गोलंदाजांना या सामन्याद्वारे पहिल्या कसोटी सामन्याच्या दृष्टीने तयारी व सरावाची चांगली संधी मिळाली होती. मात्र, बुमराह, सैनी यांच्यासह अन्य गोलंदाजांना अपयश आल्यामुळे आता प्रत्यक्ष कसोटी सामन्यात त्यांची कामगिरी कशी होते याकडे लक्ष राहणार आहे. शमी व सिराज यांनीच या सामन्यात प्रभावी गोलंदाजी केली.
भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला येत्या गुरुवारपासून ऍडलेडला होत असलेल्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी सामन्याद्वारे प्रारंभ होत आहे. भारतीय संघ प्रथमच परदेशात दिवस-रात्र कसोटी सामना खेळत असल्यामुळे या सराव सामन्यातील खेळ आगामी कसोटी मालिकेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात होता.
संक्षिप्त धावफलक – भारत पहिला डाव – 48.3 षटकांत सर्वबाद 194 धावा. (शुभमन गिल 43, पृथ्वी शॉ 40, जसप्रीत बुमराह नाबाद 55, महंमद सिराज 22, जॅक वाइल्डरमाऊथ 3-13, सिन अबॉट 3-46). ऑस्ट्रेलिया अ पहिला डाव – 32.2 षटकांत सर्वबाद 108 धावा. (अलेक्स कॅरी 32, मार्कस हॅरीस 26, नवदीप सैनी 3-19, महंमद शमी 3-29, जसप्रीत बुमराह 2-33, महंमद सिराज 1-26). भारत दुसरा डाव – 90 षटकांत 4 बाद 386 घोषित. (अजिंक्य रहाणे 38, शुभमन गिल 65, मयंक आग्रवाल 61, हनुमा विहारी नाबाद 105, ऋषभ पंत नाबाद 103. मार्क स्टिकेटी 2-54). ऑस्ट्रेलिया दुसरा डाव – 75 षटकांत 4 बाद 307 धावा. (अलेक्स कॅरी 58, जॅक वाइल्डरमाऊथ नाबाद 111, बेन मॅक्डरमॉट नाबाद 107, महंमद शमी 2-58, हनुमा विहारी 1-14, महंमद सिराज 1-54).