मुंबई : राज्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे शाब्दिक युद्ध होताना पाहायला मिळत आहे. रोजच नव्या प्रकरणावरून दोन्ही पक्षतील नेते एकमेकांच्या समोर येताना दिसत आहेत. त्यातच आता औरंगजेबाला ज्याप्रमाणे स्वप्नात शिवाजी महाराज दिसायचे. त्याप्रमाणेच चंद्रकांत पाटील यांना स्वप्नात केवळ अजित पवारच दिसतात, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी लगावला आहे.
चंद्रकांत पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. पाण्याविना मासे तडफडतात तशी राज्यातील भाजप नेत्यांची अवस्था आहे. मात्र, त्यांनी उगाच सत्तेची स्वप्न पाहू नयेत. राज्यात पुढील 15 वर्षे महाविकासआघाडीची सत्ता असेल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. आता या टीकेला भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकार झोपेत असतानाच पडेल, असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले होते. सरकार जाणार, हे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी जागे असताना की झोपेत केलं होतं, असा प्रश्न अजितदादांनी विचारला. यावर चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना चांगलेच सुनावले आहे. त्यामुळे सध्या अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर टीका करताना तोंड सांभाळून बोलावे. नाहीतर आम्ही फाटक्या तोंडाचे आहोत. आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला महागात पडेल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. झोपेत असताना सरकार कसं आणायचं, हे अजित पवार यांना चांगलेच ठाऊक आहे. तुम्ही शरद पवार झोपेत असताना सरकार स्थापन करुन मोकळे झाला होतात. मात्र, अजित पवार यांना आपण काल काय केलं होते, ही गोष्ट लक्षात राहत नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.