औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज (दि. 1) औरंगाबद येथे सभा झाली. या सभेला मनसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. यावेळी त्यांनी मशिदीवरील भोंगे उतरण्याबाबत पुन्हा इशारा दिला आहे. 4 मेपासून आम्ही अजिबात ऐकणार नाही म्हणत, 4 मे नंतर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन त्यांनी मनसैनिकांना केले. त्याचबरोबर त्यांनी शरद पवार यांच्यावरही कडवी टीका केली. शरद पवार हे नास्तिक आहेत याची कबुली त्यांच्या कन्येने (खासदार सुप्रिया सुळे) यांनी लोकसभेत दिलीय, असे त्यांनी म्हंटले.
शरद पवार यांच्यावर निशाणा साधताना राज ठाकरे म्हणाले, पवार साहेबांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे. शरद पवार नास्तिक आहेत म्हटल्यावर त्यांना झोंबले. त्यानंतर देवाचे, पूजेचे फोटो बाहेर काढले. परंतु शरद पवारांच्या कन्येने स्वत: लोकसभेत ते नास्तिक असल्याची कबुली दिली आहे. तसेच हा महाराष्ट्र शाहू, फुले आंबेडकरांचा आहे पण त्याआधी हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. आज संपूर्ण मराठेशाहीचा इतिहास विसरलो. आम्ही महापुरुषांच्या जन्मतिथी आणि पुण्यतिथी साजरी करत आहे. ज्या दिवशी या समाजाच्या अंगात शिवाजी येईल तेव्हा संपूर्ण जग पांदक्रांत करता येईल. छत्रपतींचा जन्म झाला महाराष्ट्रचं दार उघडलं. स्वाभिमानाने कसं जगायचे हे आमच्या राजानं शिकवले आहे. केवळ 50 वर्षाच्या आयुष्यात महाराजांनी भव्य काम केले. जे इतिहास विसरले आहे त्यांचा भूगोल सटकला आहे, असे राज ठाकरे म्हणाले.
त्याचबरोबर संभाजीनगर हा महाराष्ट्राचा मध्य आहे, यापुढील माझ्या सर्व सभा मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार. महाराष्ट्रासमोर आज अनेक प्रश्न आहेत. महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळेच राज्याच्या सर्व भागांमध्ये सभा घेणार, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले.