औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून करोना रूग्णसंख्येत वाढ होत आहे. अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तर काही जिल्ह्यांत कडक लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या मोहिमेलाही वेग आलाय. वैद्यकीय कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर, तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जातेय. मात्र, औरंगाबादेत करोनाची लस घेतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे लसीच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कर्तव्यावर असताना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान पोलीस हवालदाराची प्राणज्योत मालवली. भास्कर शंकर शेटे असे त्यांचे नाव आहे. त्यांनी आठ दिवसांपूर्वीच करोनाची लस घेतली होती. ते बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.
याप्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शेटे यांच्या सिटी स्कॅनमध्ये करोनाची लक्षणेही आढळली असल्याची माहिती समोर आली आहे. कर्तव्यावर असताना त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शेटे यांनी 13 फेब्रुवारीला करोना लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यांचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील अनेक शहरांत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यात सोमवारी रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली येणार आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातही सोमवारपासून रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच अमरावती जिल्ह्यात सोमवारी रात्री 8 वाजतापासून आठवडाभर कडक लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अनलाॅकनंतरचा राज्यातील हा पहिलाच लाॅकडाऊन आहे.