औरंगाबाद – काँग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेने एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकारची स्थापन केली. पण आता राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्तेत न्याय मिळत नसून, शिवसेनेच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात असा आरोप टोपे यांनी केला आहे. पक्षाच्या मेळाव्यात त्यांनी हे वक्तव्य केले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या.
राज्यातील सत्तेत सोबत असतानाही सत्तेचा वाटा मिळत नसून आमच्यावर अन्याय होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून सतत केला जातोय. पण यातच आता राष्ट्रवादीची भर पडली असून, शिवसेना मंत्र्यांकडून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फोडले जात असल्याचा आरोप खुद्द राष्ट्रवादीच्या मंत्र्याने केला आहे. राजेश टोपेंचा रोख हा रोहयो मंत्री भामरे आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येते.
टोपे यांच्या आरोपाला शिवसेनेच्या मंत्र्यांनी उत्तर दिले आहे. टोपे यांचे आरोप खोटे असल्याचे रोहयो मंत्री भुमरे म्हणाले आहेत. राष्ट्रवादी हा पक्ष प्रायव्हेट कॅरियर झाला असून, त्यांना फोडण्याची गरज काय असे महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
एकीकडे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत युती करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दुसरीकडे ग्राउंडवर मात्र काही केल्या दोन पक्षाचे नेते कार्यकर्ते एकत्र यायला तयार नसल्याचे चित्र आहे.