औरंगाबाद – प्रेमविवाह केला म्हणून सख्या भावानेच सख्या बहिणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबादमधील लाडगाव येथे घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
किशोरी मेटे असे हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, 19 वर्षीय किशोरीने सहा महिन्यांपूर्वी पळून जाऊन पुण्यातील आळंदी येथे विवाह केला होता. त्यानंतर ते लाडगाव शिवारात राहण्यासाठी आले होते. ही माहिती मिळताच भाऊ संकेत मोटे याने लाडगाव गाठले. त्यानंतर बहिणीला प्रेमविवाह का केला? असा जाब विचारला.
यावेळी राग अनावर झालेल्या भावाने जवळच असणाऱ्या कोयत्याने बहिणीवर सपासप वार केले. यात किशोरीचा जागीच मृत्यू झाला. हा सर्व प्रकार पाहून किशोरीच्या पतीने घटनास्थळावरून पळ काढत आपला जीव वाचवला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचे गांभिर्य ओळखून पोलिसांनी आरोपी भाऊ आणि आई यांना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे.