औरंगाबाद – प्रेमविवाहानंतर सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरूणीने टोकाचे पाऊल उचलत जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील वाळूज महानगर परिसरात उघडकीस आली आहे. अंजली रोहित आव्हाड (वय 21, रा. बजाजनगर) असे मृत तरूणीचे नाव आहे. तीने गकफास घेऊ टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंजलीचा प्रेमविवाह 9 नोव्हेंबर 2022 रोजी रोहित कारभारी आव्हाड (वय 22 , वर्षे रा. बजाजनगर) या तरुणासोबत झाला होता. त्यांच्या लग्नाला घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे प्रेमविवाह केला. त्यानंतर पुन्हा ते वाळूजला घरी परतले. दरम्यान, काही दिवसांत अंजलीचा पती आणि सासरकडील मंडळींत कुरबुरी सुरू झाल्या. तर सासरकडच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याने शनिवारी या विषयी तक्रार देण्यासाठी अंजली एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी अंजली हिची आई गीता आणि पती रोहित यांच्या नातेवाईकांना बोलावून त्यांचे समुपदेशन केले होते.
पोलिसांच्या समुपदेशानंतर अंजली ही सासरी न जाता बजाजनगर येथील कनकधारा सोसायटीत राहणाऱ्या तिच्या आईकडे गेली होती. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे अंजलीची आई कंपनीत कामासाठी गेल्या होत्या. यावेळी अंजली ही घरी एकटीच होती. तेव्हा तीने टोकाचे पाऊल उचलले. अंजली यांच्या आईने तीला फोन केला असता तीने फोनला उत्तर दिले नाही. त्यामुळे अंजली यांच्या आईने शेजारच्यांना घरी जाऊन पाहण्यास सांगितले. शेजारच्यांनी घराच्या खिडकीतून डोकाऊन पाहिले असता. धक्कादायक घटना समोर आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अंजलीला उपचारासाठी घाटी दवाखान्यात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले.
मृत अंजलीच्या वडिलांचे 4 वर्षांपूर्वी निधन झाले आहे. घरची जबाबदारी आईच्या खांद्यावर होती. त्या एका कंपनीत काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवित होत्या. तर घरची परिस्थिती हलाखीची असल्याने अंजली दहावीनंतर बजाजनगर येथील एका खासगी कोचिंग क्लासेसमध्ये काम करून आईला हातभार लावत होती. दरम्यान, तिची ओळख रोहितशी झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र रोहितच्या घरच्यांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी पळून जाऊन लग्न केले. मात्र अखेर या नात्याचा शेवट कडू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.