नगर – भिंगारमधील सैनिकनगर येथील सद्गुरू रोहिदासजी बहुउद्देशीय ग्रामीण विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, विश्वस्तांनी जिल्ह्यातील अनेक तरूणांनाकडून नोकरीला लावून देण्यासाठी पैसे घेवून फसवणूक केली. अनेक वर्षे नोकरी करून देखील पगाराची रक्कम दिली नाही. ऑगस्ट 2019 मध्ये फसवणूकदारांनी विश्वस्तांविरोधात फसवणूकीची पहिली फिर्याद दिली.
ऑगस्ट पासून आत्तापर्यंत 19 फिर्यादी दाखल झाल्या आहेत. तरी अद्याप सात आरोपी पैकी एकालाही पोलिसांनी अटक केली नाही. याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हा पोलीस अधीक्षक व भिंगार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना 12 मार्चपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
रोहिदासजीच्या विश्वस्तांवर न्यायालयाच्या आदेशानुसार भिंगार पोलिसांनी फसवणूक झालेल्या 19 लोकांच्या फिर्यादी दाखल करून घेतल्या आहेत. फिर्यादी दाखल झाल्यानंतर आता गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. फसवणूकीची पहिली फिर्याद 20 ऑगस्ट 2019 रोजी दाखल झाली आहे.
पाच महिने झाले तरी गुन्हे दाखल झालेले संस्थेचे अध्यक्ष सुभाष बन्सी साळवे, खजिनदार अनिता सुभाष साळवे, संस्थेचे सदस्य संजय बन्सी साळवे, रेखा संजय साळवे (सर्व रा. आलमगीर रोड, विजयनगर, भिंगार), सचिव अनिल तुळशीदास शिंदे, उपाध्यक्ष मंगल अनिल शिंदे (दोघे रा. इंदिरानगर, श्रीरामपूर), राजू बन्सी साळवे (रा. खांडगाव, ता. पाथर्डी) पसार आहे. सुरूवातीला या गुन्ह्याचा तपास भिंगार पोलिसांकडे असताना आरोपींना अटक करण्यात त्यांना यश आले नाही.