लखनऊ – उत्तर प्रदेशातील औरैयामध्ये काल रात्री शिक्षकाच्या मारहाणीत दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे मोठा गोंधळ उडाला. तेथे संतप्त लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांची गाडी पेटवून देण्यात आली आहे. काल रात्री संतप्त लोकांनी विद्यार्थ्याच्या मृतदेहासह निदर्शने केली. मुलावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत.
दहावीच्या दलित विद्यार्थ्याच्या मृत्यूवरून औरैयामध्ये खळबळ उडाली आहे. शाळेतील शिक्षकाने केलेल्या बेदम मारहाणीमुळेच विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. संतप्त लोकांनी विद्यार्थ्याचा मृतदेह रस्त्यावर ठेवून महाविद्यालयाबाहेर निदर्शने केली. कॉलेज प्रशासनाने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली.
परिस्थिती बिघडली त्यावेळी कानपूरचे आयुक्त राजशेखर तातडीने कुटुंबीयांना भेटण्यासाठी पोहोचले. त्यानंतर हा गोंधळ शांत झाला. प्रकरण औरैया जिल्ह्यातील अछलदा येथील आदर्श इंटर कॉलेजचा आहे. 7 सप्टेंबर रोजी सामाजिक शास्त्राच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने चुका केल्याचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली.
मारहाणीमुळे विद्यार्थ्याची प्रकृती खालावल्याने त्याला सैफई वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. गोंधळ वाढल्यानंतर आरोपी शिक्षक फरार झाला आहे.
या प्रकरणाला राजकीय रंगही आला आहे. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद ‘रावण’ यांनी योगी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. औरैयामध्ये एका शालेय विद्यार्थ्याचा शिक्षकाच्या निर्दयी मारहाणीमुळे मृत्यू होतो, या हुकूमशाहीच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे आहोत. असेही ते म्हणाले आहे.