कोलकाता -ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका जर भारतीय संघाला जिंकायची असेल तर भारताच्या गोलंदाजांना केवळ वेगवान गोलंदाजीच करावी लागेल, असे मत माजी कर्णधार व भारताचे महान वेगवान गोलंदाज कपिलदेव यांनी व्यक्त केले आहे.
मध्यमगती गोलंदाजीवर खेळण्याची त्यांना चांगलीच सवय आहे. सध्याच्या त्यांच्या संघात अती वेगवान गोलंदाज नसल्याने त्यांनाच आता या वेगाचा सामना करताना दडपण येते हे अनेकदा दिसून आले आहे, त्यामुळे जसप्रीत बुमराह व महंमद शमी यांनी गोलंदाजी करताना प्रत्येक चेंडू अत्यंत वेगाने टाकण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
चेंडूला उसळी मिळणाऱ्या खेळपट्ट्या ही ऑस्ट्रेलियातील खासियत असते. गेल्या दशकापासून त्यात काही बदलही झाले आहेत. मात्र, सध्या हिवाळा असल्याने हवेत गारवा राहणार आहे, त्याचा लाभ घेत चेंडू स्विंग करणे सोपे ठरेल. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपेक्षा चेंडू स्विंग करण्याची जास्त क्षमता आपल्या गोलंदाजांकडे आहे. संपूर्ण ताकद वापरून अत्यंत वेगाने चेंडू टाकण्याकडे त्यांचा कल राहिला पाहिजे, असेही कपिल देव म्हणाले.
या मालिकेत घरच्या मैदानावर खेळण्याचा ऑस्ट्रेलियाला जास्त लाभ होणार असल्याचे जरी सांगितले जात असले तरीही त्यांना पराभूत करण्याची क्षमता सध्या जागतिक क्रिकेटमध्ये केवळ भारताकडे आहे. त्यामुळे कोणतेही दडपण न घेता खेळ केला तर भारतीय संघ या मालिकेतही गेल्या दौऱ्यासारखा चमत्कार करू शकतो, असा विश्वासही कपिल यांनी व्यक्त केला.