अॅडलेड – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर पालकत्व रजेवर मायदेशी परतत असल्याने नेतृत्वाची धुरा उपकर्णधार अजिंक्य रहाणेकडे येणार आहे. कोहलीने त्याच्यावरील विश्वास व्यक्त करताना ही जबाबदारी रहाणे समर्थपणे सांभाळेल, असे मत व्यक्त केले आहे.
अॅडलेडच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर भारतीय संघाचा नियमीत कर्णधार कोहली मायदेशी परतणार आहे. कोहलीच्या अनुपस्थिती उर्वरीत तीन कसोटी सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व रहाणे करणार आहे.
रहाणेने याआधीही भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. या दौऱ्यातही रहाणे स्वत:ला सिद्ध करेल. रहाणे एक चांगला फलंदाज आणि आक्रमक कर्णधार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलियात कुठेही कमी पडणार नाही, याची काळजी रहाणे घेईल. रहाणे ऑस्ट्रेलियाविरोधातील कसोटी मालिकेत स्वत:ला कर्णधार आणि फलंदाज म्हणून सिद्ध करेल, असा विश्वास कोहलीने व्यक्त केला.
गत दौऱ्यापेक्षा यंदाचे आवाहन जास्त कठीण आहे. प्रत्येकवेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेल्यानंतर वेगवेगळ्या आव्हानांचा सामना करावा लागतो, असेही कोहली म्हणाला. शुभमन गिल एक प्रतिभावान खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तो कशाप्रकारे खेळतो, हे पाहण्यास मी देखील उत्सुक आहे, असेही कोहलीने सांगितले.