दौंड – दौंड शहरानजीक असणाऱ्या दौंड-काष्टी पुलावरील वाहतूक सकाळी सुरू झाली होती. मात्र पुलावर ठीक ठिकाणी पडलेल्या खड्डयांमुळे पूल खचला असल्याची भीती वाटू लागल्याने पोलिसांनी वाहतूक बंद केली. नंतर फक्त हलकी वाहने या पुलावरून सुरू करण्यात आल. त्यानंतर या पुलाचे ऑडिट करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला बोलविण्यात आले असून त्यांनी या पुलास भेट दिली आहे.
भीमा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील वाहतुकीचे पूल पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद होती. मात्र, पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने आता पूल उघडे झाले असून, सध्या वाहतूक सुरू करण्यात आली आहे. यावेळी दौंड-काष्टी पुलावर खड्डे पडले असल्याचे आढळून आल्यानंतर येथील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद करून हलक्या वाहनांना जाण्यास परवानगी देण्यात आली. येथे सार्वजनिक बानधकाम खात्याचे अधिकारी पुलाच्या ऑडिटसाठी असले तरी अद्याप त्यांचा अहवाल काय आला आहे, हे समजू शकले नाही किंवा याबाबत कोणीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र सध्या या पुलावरून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, दौंड शहरासह तालुक्यात भीमा नदीला आलेला पूर ओसरला असल्यामुळे जनजीवन पूर्ववत होत आहे. मागील तीन-चार दिवसांपासून भीमा नदीला मोठ्या प्रमाणावर पूर आला होता. सध्या धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे धरणातून सोडण्यात येणार विसर्गही कमी झाला आहे. त्यामुळे भीमा नदीला आलेला पूर ओसरला आहे
पूरग्रस्त भागातील जी कुटुंबे स्थलांतरित करण्यात आले होती त्यांना प्रत्येकी दहा किलो तांदूळ आणि दहा किलो गहू देण्याची व्यवस्था सरकारी दुकानदारांमार्फत दौंड तहसीलच्या वतीने करण्यात आली आहे. त्यानुसार त्यांना त्यांचे वाटप करण्यात येत आहे.
– सचिन आखाडे, निवासी नायब तहसीलदार, दौंड