मुंबई : पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला होता. यातच आता पुन्हा एकदा त्यांनी संजय राठोड प्रकरणात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या ऑडिओ क्लीपशी छेडछाड केली जात आहे, असा आरोप केला आहे.
पत्रकारांशी बोलतांना चित्र वाघ म्हणाल्या,’महाविकासआघाडी सरकारमधील कुठल्या मंत्र्याच्या किंवा व्यक्तीच्या सांगण्यावरून क्लीपशी छेडछाड केली जात आहे? सरकार संजय राठोड यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आम्हाला आहे. तेव्हा सरकारने कुठलीही हेराफेरी न करता सत्य महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान,संजय राठोड यांच्या राजीनाम्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर पटलवार केला होता. राजीनामा घेणे, गुन्हा दाखल करुन मोकळे होणे म्हणजे न्याय देणे नव्हे. या प्रकरणाचा तपास नि:पक्षपातीपणाने व्हावा ही भूमिका आमची आहे. जे तपासातून समोर येईल त्यानुसार कारवाई होईल, असे आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी दिले होते. तसेच भाजपकडून राज्यात गलिच्छ राजकारण सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते.